ऑक्सफर्डने विकसित केलेल्या कोरोना विषाणूवरील लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरल्यामुळे जगभरात सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत. उर्वरित दोन फेजचे टप्पेही या लसीने यशस्वीपणे पार करावेत, अशीच सर्वांची इच्छा आहे. असं झालं तर सर्वांना दिलासा मिळेल. जगाचं लक्ष कोरोनाच्या लसीवर आहे. या लसीचा फायदा भारताला जास्त होणार आहे. कारण भारताची सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही संस्था या प्रकल्पात भागीदार आहे. त्यामुळे सर्व काही नियोजनानुसार झालं, तर भारतीयांनाही ही लस नोव्हेंबरपर्यंत मिळू शकते.
ऑक्सफर्डच्या लसीवर सर्वांच्या नजरा लागून आहेत. भारतासाठी ही लस महत्त्वाची असणार आहे. कारण भारताची सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया कंपनीने ऑक्सफोर्ड लसीत गुंतवणूक केली आहे. पण सुरुवातीला या लस प्रकल्पात गुंतवणूक करण्याचा निर्णय इतका सोपा नव्हता. या लसीची सुरुवातीला कुठलीही चाचणी झाली नव्हती, त्यावेळी सिरमने या प्रकल्पात २० कोटी डॉलर गुंतवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यासाठी त्यांना फक्त ३० मिनिटं लागली. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी एनडीटीव्हीला ही माहिती दिली. या निर्णयामध्ये व्यावसायिक धोका होता आणि आजही आहे. उर्वरित फेजमध्ये अपेक्षित निकाल मिळाले नाहीत तर संपूर्ण स्टॉक नष्ट करावा लागू शकतो, असं त्यांनी सांगितलं.
पहिल्या फेजचा निष्कर्ष
या लसीच्या पहिल्या फेजच्या मानवी परीक्षणाचा अहवाल सोमवारी लॅन्सट जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. वैद्यक क्षेत्रातील सर्वांचेच या अहवालाकडे लक्ष लागलं होतं. ऑक्सफर्डने विकसित केलेली ही लस मानवी शरीरात अँटीबॉडीजची निर्मिती करण्याबरोबरच रोगप्रतिकारक वाढवण्यात यशस्वी झाली आहे. शिवाय, या लसीने शरीरात किलर टी-सेल्सची निर्मिती सुद्धा केली आहे. तसंच गंभीर साईड इफेक्ट सुद्धा दिसलेले नाहीत.
हेही वाचा – राम मंदिर भूमिपूजनापूर्वी बाबरी कटाचा खटलाच बरखास्त करा…