भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कार्यकाळात भारत-पाकिस्तान द्विपक्षी संबंध अनेक स्तरावर सुधारले होते. त्याच दरम्यान दिल्ली-लाहोर बस देखील सुरू झाली होती. मात्र, त्यानंतरच्या काळात हे संबंध बिघडतच गेले. आता पाकिस्तानचे पंतप्रधान असलेले इम्रान खान यांनी तर भारत विरोधी मोहीमच उघडली आहे. त्यामुळेच पाकिस्तानवर अनेक जागतिक संघटनांनी बंदी घातलेली असताना आता पाकिस्तानमधून एक नवीनच सूर आळवला जात आहे. यामुळे जागतिक राजकारणात याचे पडसाद कसे उमटतात, याविषयीत राजकीय विश्लेषकांमध्ये उत्सुकता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताकडूनही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नसली, तरी या आरोपाला भारत किती महत्त्व देतो, यावर सगळं अवलंबून असणार आहे.
पाकिस्तानी रेल्वेमंत्र्यांचा मोठा आरोप!
पाकिस्तानचे शेख चिल्ली म्हणून चेष्टेचा विषय ठरणारे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ‘नवाज शरीफ हे भारताचे एजंट आहेत. पाकिस्तानच्या बाहेर जाऊन ते नरेंद्र मोदींशी फोनवर गुप्तपणे वार्ता करत असतात’, असं रशीद म्हणाले आहेत. त्यांचं हे विधान पाकिस्तानमध्ये चर्चेचं कारण ठरलं आहे. एकीकडे पाकिस्तानमधील विरोधी पक्षांच्या लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी भेटीगाठी वाढलेल्या असतानाच दुसरीकडे नवाज शरीफ यांना अशा प्रकारे टार्गेट केलं जात असल्यामुळे पाकिस्तानी राजकारणाच्या अंतर्गत वर्तुळात नक्की काय शिजतंय? याचे सूतोवाच मिळू लागले आहेत.
इमरान खान सरकारवर वाढती नाराजी!
गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय राजकारणात काश्मीर प्रश्न, चीनचा मुद्दा किंवा आंतरराष्ट्रीय लवाद यांच्यासमोर ज्या भूमिका घेतल्या, त्यामुळे त्यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावरची पत कमालीची खालावली आहे. त्यामुळेच आता FATA देखील पाकिस्तानवर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये इमरान खान सरकारला लष्कराच्या मदतीने उलथवून टाकण्याच्या हालचाली सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.