जम्मु-काश्मीर येथील पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढत चालला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला दबाव येत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर अमेरिका आणि चीन सारख्या मोठ्या देशांंनीही पाकिस्तानची साथ सोडली आहे. याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत दहशतवादाचे अस्तित्व न स्विकारणाऱ्या पाकिस्ताने अखेर देशांअतर्गत दहशतवाद्यांवर कारवाई करणार असल्याचे म्हटलं आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत १८२ मदरसे ताब्यात घेतले तर १२१ दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. योग्य नियोजन करून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी मंत्रालयाने दिली आहे. या कारवाईचे इतर देशांनी स्वागत केले आहे. मात्र पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्थरावर दाखवण्यासाठी ही कारवाई करत असल्याची टीकाही केली जात आहे.
जैश-ए-मोहम्मद संघटनेने केला होता हल्ला
१४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहिद झाले होते. या हल्ल्याच्या काही वेळातच जैश-ए-मोहम्मद संघटनेने घेतली होती. यानंतर दहशतवादविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने रणनिती आखत पाकिस्तानला एकटे पाडले. फ्रान्स, इस्त्राइल आणि ब्रिटन या देशांनीही भारताला पाठिंबा दिला. याचाच फायदा घेत भारताने विमान हल्ला केला होता.