इस्लामाबाद : अतिरेक्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानने चक्क अफगाणिस्तानलाच दहशतवाद निर्मूलनाचा सल्ला दिला आहे. आपल्या भूभागात सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांना पायबंद घालण्याची इच्छाशक्ती आणि क्षमता हंगामी अफगाण सरकारने दाखवली नाही तर, दहशतवाद पाकिस्तानातून अन्यत्र पसरायला फार वेळ लागणार नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांनी शनिवारी सांगितले.
जर्मनीतील म्युनिक सुरक्षा परिषदेला संबोधित करताना पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी यांनी हा सल्ला दिला. अफगाणिस्तानबाबतचा सर्वात महत्वाचा मुद्दा हा देशाची सुरक्षा आणि दहशतवादाचा धोका हा आहे. तथापि, या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय समुदाय किंवा अफगाण सरकारकडून पुरेसे गांभीर्य दाखवले गेले नाही, याबद्दल बिलावल भुत्तो यांनी खेद व्यक्त केला.
“The key is to convince … the interim government in Afghanistan with the international community’s consensus, to take on terrorism within their borders and demonstrate the will to do so,” he said.https://t.co/lDuyj347iT
— Dawn.com (@dawn_com) February 18, 2023
आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सहमतीने आपल्या भूभागावरील दहशतवाद निपटून काढण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी अफगाणिस्तानच्या हंगामी सरकारला केले. अंतरिम अफगाण सरकारला स्थायी सैन्य तयार करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याचे आवाहनही त्यांनी जागतिक नेत्यांना केले आहे. त्यांच्याकडे स्थायी सैन्य नाही. दहशतवादविरोधी दल किंवा योग्य सीमा सुरक्षाव्यवस्था देखील नाही. अशावेळी त्यांच्याकडे कितीही इच्छाशक्ती असली तरी दहशतवादी धोक्याचा मुकाबला करण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही, हीच एक समस्या आहे. त्यामुळेच शेजारील देशांबरोबरच आंतरराष्ट्रीय समुदायासाठी धोका आहे, असे भुत्तो म्हणाले.
आपण आणि अफगाण सरकारने या दहशतवादी गटांना गांभीर्याने घेतले नाही आणि या गटांवर कारवाई करण्याची मानसिकता आमि क्षमता त्यांनी दाखवली नाही, तर या परिसरात दहशतवादी कारवाया सुरू होतील आणि नंतर हळूहळू त्या पाकिस्तानच्या बाहेर इतरत्र पसरतील, असे सांगून ते म्हणाले, काबूलमधून अमेरिकन सैन्य निघून गेल्यानंतर दहशतवादी कारवाया आणखी वाढल्या आहेत. पण आता अन्यत्र पोहोचायला वेळ लागणार नाही.
पाकिस्तानला अफगाणिस्तानवर आक्रमण करायचे नाही. तसेच भूतकाळातील चुकाही उगाळत बसायच्या नाहीत. त्यामुळेच संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणार्या अफगाणिस्तानातील एजन्सी कार्यरत राहणे, हेच महत्त्वाचे ठरेल, असेही ते म्हणाले.