संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशानच्या सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं अभिभाषण झालं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयांवर भाष्य केलं. कृषी कायदे, कोरोना काळातील सरकारचे निर्णय, प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावर देखील भाष्य केलं. कृषी कायदे छोट्या शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं. तसंच त्यांनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावर नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाषण वाचलं. कोरोना महामारीच्या काळात संसदेच्या या सत्राला महत्त्वाचं म्हटलं. अभिभाषणात राष्ट्रपतींनी केंद्र सरकारचं कौतुक केलं. कृषी कायद्यांवर बोलताना राष्ट्रपतींनी हे कायदे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत, असं म्हटलं. यावेळी त्यांनी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावर नाराजी व्यक्त केली. तिरंगा आणि प्रजासत्ताक दिनाचा अपमान दुर्दैवी असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “संविधान आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देतं, राज्यघटना आपल्याला शिकवते की कायदा व नियम तितकाच गांभीर्याने पाळला पाहिजे.”
केंद्र सरकारचं कौतुक
माझ्या सरकारने कोरोनाच्या काळात घेतलेल्या अचूक निर्णयांमुळे कोट्यवधी देशवासीयांचे प्राण वाचले याबद्दल मी समाधानी आहे. आज नवीन कोरोना रूग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे आणि ज्यांना संसर्ग होऊन बरे झाले आहेत त्यांची संख्याही खूप जास्त आहे.
‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने’च्या माध्यमातून ८० कोटी लोकांना ८ महिन्यांसाठी ५ किलो अतिरिक्त धान्य मोफत देण्यात आलं. सरकारने स्थलांतरित मजूर, कामगार आणि बाहेर गावी राहणाऱ्या लोकांची देखील काळजी घेतली. माझ्या सरकारने कोरोनामुळे रोजगार गेल्याने स्वत:च्या राज्यात परतलेल्या मजुरांसाठी सहा राज्यांमध्ये गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु केलं. यामुळे ५० कोटी रोजगार उपलब्ध झाले, असं राष्ट्रपतींनी सांगितलं.
हेही वाचा – Union Budget 2021: अधिवेशनात सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तयार – पंतप्रधान मोदी