बिहारमध्ये पुन्हा एकदा विषारी बनावट दारूचा कहर पाहायला मिळत आहे. या विषारी दारुमुळे आत्तापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. यात मसरखमध्ये सर्वाधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर अर्धा डझनहून अधिक जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचे नातेवाईक आजारपणामुळे मृत्यू झाल्याचे सांगत आहेत. या घटनेबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस माहिती आलेली नाही. या घटनेचा संपूर्ण तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी संतोष कुमार म्हणाले.
या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मशरख हनुमान चौक स्टेट हायवे 90 वर मृतदेह ठेवून रोखून धरला होता. स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. या घटनेनंतर नागरिकांचा आक्रोश पाहता पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
इसुआपूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील डोईला येथे अमनौर, मधौरा आणि मसरख ब्लॉकमधील 14 लोकांचा विषारी दारू पिल्याने मृत्यू झाला, तर इतर सहा जण गंभीर आजारी आहेत. सर्व आजारी लोकांना मसरख आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तेथून एका व्यक्तीला छपरा सदर रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. त्याच्यावर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी सायंकाळी सर्वांनी एकाच ठिकाणी दारू प्यायल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मंगळवारपासून त्यांची प्रकृती ढासळू लागली. सर्वांना सायंकाळी मसरख आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.