पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यामध्ये बुधवारी काही त्रुटी निर्माण झाल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनीसुद्धा भटींडा विमानतळावर पोहचल्यावर संताप व्यक्त केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री मोदींच्या दौऱ्यात सहभागी झाले नव्हते. तर पंजाबच्या शेतकऱ्यांनी मोदींचा ताफा रोखला होता. यामुळे मोदींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदी ज्या मार्गाने जातात तो मार्ग पूर्ण बंद केला जातो. परंतु पंजाबमध्ये घडलेल्या प्रकारावरुन मोदींच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा झाला असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये काही धक्कादायक खुलासेही झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौऱ्यावर होते. पंजाबमध्ये मोदींच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा झाला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार पंजाबचे मुख्य सचिव आणि डीजीपी जाणूनबुजून मोदींच्या ताफ्यात सहभागी झाले नव्हते. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी आंदोलनकारी शेतकऱ्यांसोबत गप्पा मारत होते.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातील धक्कादायक खुलासे
पंतप्रधान मोदी यांच्या गाड्यांचा ताफा फिरोजपुर येथील उड्डाणपुलावरुन जाणार होता. याच मार्गावर शेतकरी आंदोलन करण्यासाठी एकत्र जमले होते. परंतु मोदींच्या ताफ्यासाठी मार्ग रिकामा करण्याचे सोडून पोलीस कर्मचारी चहा घेत चर्चा करत होते. यामुळे असा प्रश्न उपस्थित होत आहे की, ज्या पोलीस कर्मचाऱ्यांवर सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती ते चहा पिण्यात व्यस्त का होते?
पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यात मुख्य सचिव आणि डीजीपींसाठी गाडी राखीव ठेवण्यात आली होती. परंतु मुख्य सचिव आणि डीजीपीसारखे मोठे अधिकारी सहभागी नव्हते. जर एखाद्या राज्यात पंतप्रधान मोदी दौऱ्यासाठी जाणार असतील तर मोदींच्या स्वागतासाठी त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव उपस्थित राहतात. परंतु पंजाबमध्ये असे काही घडले नाही.
पंजाबमधील पोलिसांना घटना घडणार असल्याची माहिती होती? जर पोलिसांना माहिती होती तर मोदींचा ताफा त्या मार्गाने का जाऊ दिला. आंदोलनकारी शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी या मार्गाने येणार असल्याची माहिती होती मात्र शेतकऱ्यांना ती माहिती कशी मिळाली असा सवाल उपस्थित होतो आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यातील मार्ग कोण ठरवते
एसपीजी, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि ज्या राज्यांमध्ये पंतप्रधान दौरा करणार त्या राज्यातील स्थानिक पोलीस या तीन विभागांच्या समन्वयाने पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातील मार्ग ठरवण्यात येतात. परंतु अंतिम निर्णय एसपीजीकडून घेण्यात येतो. रस्ते मार्गाची जबाबदारी स्थानिक पोलिसांवर असते. जर रस्त्यामध्ये काही अडथळे असतील तर ते दूर करण्याची जूबाबदारी पोलिसांवर असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या मार्गामध्ये शेतकरी आंदोलन करत होते तर गुप्तचर यंत्रणांकडून पोलिसांना माहिती कशी मिळाली नाही. मोदींना राखीव मार्गाने का नेण्यात आले नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे.