Homeदेश-विदेशSwachh Bharat : स्वच्छ भारत मोहिमेची खिल्ली उडवली, पण भंगार विकून 2300...

Swachh Bharat : स्वच्छ भारत मोहिमेची खिल्ली उडवली, पण भंगार विकून 2300 कोटी कमावले, पंतप्रधानांनी हिशोबच मांडला

Subscribe

आम्ही सुरू केलेल्या स्वच्छता योजनेची विरोधकांनी खिल्ली उडवली, पण त्याच माध्यमातून सरकारी कार्यालयातील भंगार विकून 2300 कोटी रुपये सरकारी तिजोरीत आल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

PM Modi Lok Sabha Speech : नवी दिल्ली : लोकांनी आम्हाला दिलेल्या संधीचा आम्ही योग्य उपयोग केला आणि आतापर्यंत 40 लाख कोटी रुपये लोकांच्या खात्यावर जमा केले. पण काही लोक गरिबांच्या झोपडपट्टीत जातात आणि तिथे फोटोसेशन करण्यातच धन्यता मानतात, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या अनेक आरोपांवर उत्तरे दिली. आम्ही सुरू केलेल्या स्वच्छता योजनेची विरोधकांनी खिल्ली उडवली, पण त्याच माध्यमातून सरकारी कार्यालयातील भंगार विकून 2300 कोटी रुपये सरकारी तिजोरीत आल्याचे मोदी यावेळी म्हणाले. (pm modi slams congress india alliance over swachhata mohim)

ही आमची तिसरी टर्म आहे. त्यातच दहा वर्षांपासून भारत हा उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. आम्ही इथेनॉलच्या निर्मितीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलची आयात कमी झाली. त्यावरील खर्च कमी झाला. या निर्णयामुळे एक लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे आणि ते सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खिशात गेले आहेत. गेल्या दहा वर्षांत एकही घोटाळा झाला नाही. उलट या काळात सरकारचे लाखो कोटी रुपये वाचले आणि ते लोकांसाठीच वापरले गेल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधकांवर टीका करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेची अनेकांनी खिल्ली उडवली. स्वच्छता करून काय देश पुढे जाणार आहे का, असे प्रश्न देखील विचारले. पण आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की, या मोहिमेमुळे देशात स्वच्छता नांदू लागली आहे. याच स्वच्छता मोहिमेमुळे काळात सरकारी कार्यालयांतील भंगार काढून टाकले गेले आणि त्याच्या विक्रीतून 2300 कोटी रुपये वसूल झाले आहेत.

10 कोटी बनावट लाभार्थ्यांना बाहेरचा रस्ता

या आधीच्या सरकारच्या काळात देशातील 10 कोटी बनावट लोकांच्या नावाखाली अनेक योजनांचा लाभ घेतला जायचा. आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्या 10 कोटी बनावट नावांवर आम्ही फुली मारली. त्या त्या योजनांचे खरे लाभार्थी आम्ही शोधून काढले. त्यामुळे सुमारे 3 लाख कोटी रुपये हे चुकीच्या लोकांच्या हाती जाण्यापासून वाचले.

आम्ही देशाचा पैसा हा मोठमोठे महाल बांधण्यासाठी नाही तर तो देश घडवण्यासाठी वापरला. पायाभूत सुविधांचे बजेट 1.80 लाख कोटी रुपये होते. आज ते बजेट 11 लाख कोटी रुपये आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या उपचारासाठी सुमारे 1 लाख 20 हजार कोटी रुपये खर्च केले जातात. जनऔषधी केंद्रात औषधं खरेदीवर 80 टक्के सवलत आहे.

25 कोटी लोक गरिबीतून मुक्त

राष्ट्रपतींचे अभिभाषण सर्वसामान्यांना विकसित भारताबद्दल प्रेरणा देणारे आहे. आमच्या सरकारच्या काळात 25 कोटी लोक हे दारिद्र रेषेतून बाहेर आले आहेत. पाच दशके आम्ही गरिबी हटवण्याचे नारे ऐकले आणि आता 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. संवेदनशीलतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काही गोष्टी राबवल्यानेच हे शक्य झालं. केवळ गरिबी हटाव अशा घोषणा देऊन काही साध्य होत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.