देशातील सध्या कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएसआयआरच्या (Council of Scientific and Industrial Research) सोसायटीच्या एका बैठकीचे नेतृत्व केले. व्हिसीद्वारे मोदी या कार्यक्रमात सामील झाले होते. मोदींशिवाय या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन सहभागी झाले होते. तसेच प्रतिष्ठित वैज्ञानिक, उद्योगपती आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थितीत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच जगभरातील वैज्ञानिकांच्या खांद्याला खांदा लावत आपल्या वैज्ञानिकांची वाटचाल सुरू आहे, असे मोदींनी सांगितले.
खूप कमी वेळात कोरोनाचे कीट तयार केले
‘कोरोनाच्या सर्वात मोठ्या संकटात एका वर्षात लस, कीट तयार केली. खूप कमी वेळात संशोधन केले. दीड वर्षात शास्त्रज्ञांनी खूप मोठी कामगिरी केली आहे. कोरोना काळात अभूतपूर्व योगदान शास्त्रज्ञांनी दिलं आहे,’ असं म्हणत मोदींनी सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक केले.
भविष्यात आणखीन संकट येऊ शकते, त्याची तयारी आतापासून
पुढे मोदी म्हणाले की, ‘आज भारत शेतीपासून ते अवकाश संशोधनापर्यंत, शस्त्रसज्जपासून ते कोरोना लसीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर आणि सशक्त बनू इच्छित आहे. कोरोना संकटामुळे जरी वेग मंदावला असेल तरी पण आत्मनिर्भर भारत हा संकल्प आहे. कितीही संकटे आली तरी संकल्प पूर्ण करणार आहे. भविष्यात आणखीनही संकट येऊ शकतात. त्याची तयाराची सुरुवात आतापासून करायला पाहिजे. पुढच्या दशकाची तयारी आताच केली पाहिजे.’