पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमधील तेहरीक – ए – इन्साफ पक्षाचे प्रमुख आणि माजी क्रिक्रेटर इम्रान खान यांना फोन केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांचे अभिनंदन केले. यापूर्वी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना इम्रान खान आणि नरेंद्र मोदी यांची भेट झालेली आहे. पाकिस्तानमधील निवडणुकांमध्ये तेहरीक – ए – इन्साफ सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान असतील यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. आपण ११ ऑगस्ट पंतप्रधानपदाची शपथ घेऊ असे इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे. पुढील एक – दोन दिवसांमध्ये याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल. २५ जुलै रोजी पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यामध्ये इम्रान खान यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पण सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असे संख्याबळ नाही. त्यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांशी युती करून इम्रान खान सत्ता स्थापन करू शकतात.
…तर दोन पावले पुढे येण्यास तयार
सर्वाधिक जागी विजय मिळवल्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानी जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांनी भारताकडे देखील मैत्रिचा हात पुढे केला. भारताने पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्यास एक पाऊल पुढे टाकल्यास आपण दोन पावले पुढे टाकू असे इम्रान खान यांनी म्हटले होते. त्यामुळे आता भारत – पाकिस्तानमध्ये मैत्रिचे नवे पर्व सुरू होणार! अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र इम्रान खान यांना लष्कराचा पाठिंबा आहे. तसेच लष्कर सर्वशक्तिमान असल्याने त्यांच्या पुढे इम्रान खान यांची डाळ शिजेल का? हा प्रश्न देखील आहेच. तर आजवरचा इतिहास पाहता लष्कराच्या विरोधात जाणे इम्रान खान यांना जमेल का? हा देखील एक मोठा प्रश्न आहे.
कशी असते पाकिस्तानमधील निवडणूक
पाकिस्तानमध्ये संसदेच्या ३४२ जागांपैकी २७२ जागा प्रत्यक्षामध्ये निवडून येतात. संसदेमध्ये ६० जागा महिलांसाठी तर १० जागा अल्पसंख्यांकासाठी राखीव असतात. यावेळी बहुमतासाठी १३७ जागांची गरज असते. तेहरीक – ए – इन्साफने ११५ जागी विजय मिळवला आहे. त्यापैकी ५ जागी इम्रान खान उभे राहिले होते. पाचही ठिकाणी इम्रान खान विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांना आता ४ जागा सोडाव्या लागणार आहेत. परिणामी तेहरिक – ए – इन्साफचे संख्याबळ हे १११ वर येते. हा राजकीय पेच देखील इम्रान खान यांच्या समोर उभा राहिला आहे. आता सत्ता स्थापनेसाठी इम्रान खान नेमकं काय करतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.