भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना दारिद्र्य निर्मूलनासाठी उपयोगी पडणारा अभ्यास मांडल्याबद्दल अर्थशास्त्रातलं नोबेल जाहीर झालं. त्यानंतर त्यांच्यावर भारतभरातून आणि परदेशी भारतीयांकडून देखील कौतुकाचा तुफान वर्षाव होत आहे. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र त्यांना नोबेल जाहीर होऊन २४ तास उलटून देखील त्यांचं कौतुक केलं नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शरद पवार यांच्या एका व्हायरल व्हिडिओची भाषणात दखल घेणाऱ्या पंतप्रधानांना भारतीय वंशाच्या व्यक्तीला मिळालेल्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा कसा विसर पडला? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. अभिजीत बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या घसरणीसंदर्भात नोंदवलेलं निरीक्षण यासाठी कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.
शरद पवारांची केली होती टिंगल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एका सभेमधला व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये मोठ्या हारामध्ये पवारांसोबत घुसण्याचा प्रयत्न करताना शरद पवार दिसत आहेत. या व्हिडिओवर नरेंद्र मोदींनी जळगावच्या प्रचारसभेमध्ये टीका केली होती.
मा. मोदीजींची शरद पवारांना कोपरखळी!@narendramodi @PawarSpeaks #MahaJanadeshSankalp Jalgaon pic.twitter.com/Myap38tqml
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 13, 2019
अभिजित बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय अर्थव्यवस्था सध्या डळमळीत झाली आहे, असं बॅनर्जी म्हणाले आहेत. या अवस्थेतून भारत कशी सुधारणा करणार? ही एक समस्याच असून ती सुधारणा नजीकच्या काळात होईल, असं काही चिन्ह दिसत नाही, असं देखील बॅनर्जी यांनी नमूद केलं होतं. गेल्या ५ वर्षांत अर्थव्यवस्था अत्यंत धिम्या गतीनं प्रगती करत होती. मात्र, येत्या काळात ते देखील कठीण असल्याचं बॅनर्जी यांनी नमूद केलं होतं. बॅनर्जी यांच्या याच टीकेमुळे मोदींनी अभिजित बॅनर्जी यांचं अद्याप अभिनंदन केलं नसल्याचं बोललं जात आहे.
निर्मला सीतारामण यांचे पतीच म्हणतात, आर्थिक मंदीला मोदी सरकार जबाबदार
सीतारमण यांच्या पतीचीच अर्थव्यवस्थेवर टीका
बॅनर्जी यांच्या आधीदेखील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पतींनीच देशाच्या अर्थव्यवस्थेवर टीकास्त्र डागलं होतं. अर्थमंत्र्यांचे पती पराकला प्रभाकर यांनी द हिंदू या वर्तमानपत्रात लेख लिहून ‘नेहरूंच्या समाजवादावर टीका करत बसण्यापेक्षा अर्थव्यवस्थेचं उदारीकरण करायला हवं’, अशा शब्दांत टीका केली होती. त्यानंतर आता बॅनर्जी यांनी देखील अर्थव्यवस्थेवर टीका केली आहे.