नवी दिल्ली – संसदेचे हिवाळी (House Winter Session) अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. विविध मुद्द्यांवर हिवाळी अधिवेशनात चर्चा केली जाणार आहे. तसंच, अनेक प्रस्तावही मंजूर केले जातील. अशा परिस्थितीत सर्वपक्षीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. तरुण खासदांना अनुभव येण्यासाठी, त्यांना शिकता येण्याकरता अधिवेशन पूर्णवेळ चालवूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा – आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन, कोणते मुद्दे गाजणार?
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. याच काळात भारताला जी-२० चं अध्यक्षपद मिळालं आहे. त्यामुळे भारताकडून जगाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जागतिक पातळीवर भारत आपला सहभाग वाढवत असल्याने आपल्याला जी-२०च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. ही परिषद फक्त डिप्लोमॅटिक इव्हेंट नाही. ही परिषद म्हणजे भारताचे सामर्थ्य जगाला दाखवून देण्याची संधी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारत ही लोकशाहीची जननी आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी आम्ही सर्वपक्षीय बैठक घेऊन चर्चा केली आहे. संसदेत हे तुम्हाला दिसेलच. देशाच्या विकासाला नव्या उंचीवर नेण्यासाठी वर्तमान परिस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा प्रयत्न या अधिवेशनातून करण्यात येणार आहे. संसदेत होणाऱ्या सर्व चर्चा महत्त्वाच्या ठरणार आहेत. आपल्या विचारांना, निर्णयांना ताकद देतील. भारताच्या प्रगतीसाठी दिशा स्पष्ट केली जाईल, असंही मोदी म्हणाले.
हेही – दिल्ली महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार? आज लागणार निकाल
या अधिवेशनात अनेक तरुण खासदारही येणार आहेत. काही खासदार पहिल्यांदाच अधिवेशनात सहभागी होणार आहेत. अशा नव्या आणि तरुण खासदारांना शिकता यावं याकरता सर्वपक्षीयांनी मदत करण्याचं आवाहनही मोदींनी केलं आहे. ते म्हणाले की, अनेक तरुण खासदारांनी विनंती केली आहे की, हे अधिवेशन पूर्णवेळ चालावं, जेणेकरून आम्हाला अनुभव घेता येईल आणि शिकता येईल. त्यामुळे त्यांनाही संसदेत बोलण्याची संधी द्यायला हवी. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि लोकशाहीच्या भावी पिढीला तयार करण्यासाठी तरुण खासदारांचा सहभाग वाढावा, असंही आवाहन मोदींनी केलं आहे.