पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी आज बीएचयू मैदानावर एक बटण दाबून १५८३ कोटींच्या २८० योजनाचे उद्घाटन आणि पायभरणी केली. तसेच रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय कन्वेंशन सेंटरचे देखील उद्घाटन केले. सध्या उत्तर प्रदेशात जवळपास ५५० ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कामकाज तेजीनं सुरू असून आज वाराणसीत आणखीन १४ ऑक्सिजन प्लांट्सचे उद्घाटन केले. यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
मोदी म्हणाले की, ‘उत्तर प्रदेश पूर्ण देशामधील कोरोनाची सर्वात जास्त चाचणी करणारे राज्य आहे. तसेच संपूर्ण देशात सर्वात जास्त लसीकरण करणारे देखील उत्तर प्रदेश राज्य आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला युपी सरकारने चांगल्या पद्धतीने हाताळले आहे. सगळ्यांना मोफत लस दिली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मुलांसाठी ऑक्सिजन आणि आयसीयू सारख्या सुविधा सुरू करण्यासाठी यूपी सरकारने घेतलेला पुढाकारही कौतुकास्पद आहे. आरोग्य सुविधांवर काम होत आहेत. पहिल्यांदा ज्या आजारासाठी मुंबईला जावे लागत होते, त्याच्यावर आता राज्यातच राहून उपचार होत आहे. योगी सरकार आल्यानंतर ४ पट्टीने मेडिकल कॉलेज वाढवले आहेत.’
पुढे मोदी म्हणाले की, ‘असे नाही की २०१७ पूर्वी यूपीमध्ये योजना नव्हत्या किंवा दिल्लीतून पैसे पाठवले जात नव्हते. २०१४ पासून आमचे सरकार आल्यानंतर वेगाने प्रयत्न करण्यात आले, पण त्यावेळी लखनऊच्या योजना अडकल्या जात होत्या. योगी स्वतःची शक्ती वापरून विकासाच्या कामांना गती देतात. प्रत्येक काम स्वतः करतात. त्यामुळे यूपीत बदल होत आहे. आम्ही आधुनिक उत्तर प्रदेश बनवण्याच्या दृष्टीने वेगवान वाटचाल करत आहोत. यूपीमध्ये कायद्याचे राज्य आहे. एकेकाळी अनियंत्रित होणारे माफियाराज आणि दहशतवाद कायद्याच्या तावडीत सापडले आहेत. ज्या पद्धतीने आई-वडिलांना बहिणी आणि मुलींच्या सुरक्षिततेबद्दल काळजी होती, आता परिस्थिती बदलली आहे. जे बहिणी आणि मुलींकडे वाकड्या नजरेने पाहतात त्यांना आता हे समजले आहे की त्यांना कायद्यातून पळ काढता येणार नाही. आता सरकार नातलगावर नाही तर विकासावर चालले आहे.’