कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पोलिसांना अधिक सक्तीने लोकांना घरी बसण्यास सांगण्याची वेळ ओढवली. कारण सरकार, प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि खुद्द पोलीस यंत्रणेकडून देखील वारंवार आवाहन करून देखील अनावश्यक कामांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांची संख्या काही कमी होताना दिसत नव्हती. त्यामुळे आधी विनवणी करून पोलिसांनी लोकांना घरी जाण्याचं आवाहन केलं. पण तरीदेखील कुणी ऐकेना झाल्यावर पोलिसांनी हातात दंडुका घेतला. मात्र, यावर अनेकांनी टीका देखील केली. पण, हातात दंडुका घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सह्रदयता देखील अनेक प्रकरणांमध्ये समोर आली आहे. कर्नाटकमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे.
कॅन्सरग्रस्ताला हवं होतं औषध!
हा प्रसंग आहे कर्नाटच्या बंगळुरुमध्ये पोस्टिंगवर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. कुमारस्वामी यांचा. कुमारस्वामी ड्युटीवर असताना त्यांना कळलं की बंगळुरूपासून तब्बल ४३० किलोमीटर अंतरावर असलेल्या धारवाडमध्ये एका कॅन्सर पेशंटला तातडीने विशिष्ट औषधाची गरज आहे. या पेशंटचा जीव धोक्यात होता. पण धारवाडमध्ये ते औषध उपलब्ध नव्हतं. ते बंगळुरूमध्येच उपलब्ध होऊ शकणार होतं. हा कॅन्सर पेशंट धारवाडहून बंगळुरूला येणं शक्य नव्हतं. शिवाय, लॉकडाऊनमुळे इतर प्रवासाचे मार्ग देखील बंद होतं. पण औषध पोहोचणं आवश्यक होतं. अखेर कुमारस्वामींनी एक धाडसी निर्णय घेतला.
बंगळुरू ते धारवाड हे अंतर आहे तब्बल ४३० किलोमीटरचं. पण प्रवासाचं दुसरं वाहन शक्य नसल्यामुळे शेवटी कुमारस्वामींनी त्यांच्या बाईकवरच धारवाडपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला. ड्युटीमुळे इतर कुणाला सोबत नेता येत नव्हतं. शेवटी ते एकटेच बाईकवरून धारवाडसाठी निघाले. दिवसभर बाईकवर प्रवास करून मजल दरमजल करत अखेर ते धारवाडला पोहोचले आणि त्यांनी तातडीने ते औषध संबंधित रुग्णालयात पोहोच केलं.
Kudos to Shri. S. Kumaraswamy, Head Constable who travelled solo on bike from Bengaluru to Dharawad traversing 430 kms to provide life saving medication for a cancer patient.@CPBlr appreciated his good deed. pic.twitter.com/BSJm6caRie
— BengaluruCityPolice (@BlrCityPolice) April 16, 2020
कुमारस्वामी यांच्या या कामगिरीचा बंगळुरू पोलिसांना सार्थ अभिमान न वाटता तरच नवल! याबद्दल बंगळुरू पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी स्वत: सही केलेलं प्रशस्तीपत्रक देऊन हेड कॉन्स्टेबल कुमारस्वामींचा गौरव केला. त्यांच्या गौरवात बंगळुरू पोलिसांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून ट्वीट करत त्यांचे आभार देखील मानले! त्यामुळे कोणत्याही पोलिसावर टीका करताना ते समाजासाठी करत असलेली सेवा आधी लक्षात घेणं हे प्रत्येक जबाबदार नागरिकाचं कर्तव्यच आहे.