मुंबईः आम्ही येथे पुजापाठ करायला आलेलो नाही. आम्ही निवडणूक जिंकण्यासाठी आलो आहोत. चांगले काम केले तरच जनता निवडून देईल. म्हणूनच आम्ही काम करतो व निवडून येतो, असे केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
ते म्हणाले, प्रत्येक नेता हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच काम करत असतो. आम्हीही तेच करत आहोत. आम्ही साधू- संत नाही. आम्ही राजकारणी आहोत. निवडणूक जिंकण्यासाठीच आम्ही पण जनतेची कामे करत असतो.
आगामी लोकसभा निवडणुकीमुळेच केंद्र सरकारने मोफत अन्नधान्य योजना सुरु केली आहे, या प्रश्नावर मंत्री गडकरी यांनी हे उत्तर दिले. पुढे मंत्री गडकरी म्हणाले, प्रत्येक राज्यात रस्ते बांधले जात आहेत. प्रत्येक ठिकाणी रस्त्यांची काम सुरु आहेत. मी निवडणुका समोर ठेवून काम करत नाही. घोषणा करत नाही. मी केवळ काम करत असतो. प्रत्येकाने काम करत राहायला हवे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माझे टार्गेट काय आहे हे सांगण्याची गरज नाही. तरीही सन २०२४ अखेरपर्यंत अमेरिकेप्रमाणे भारतातही रस्ते व पायाभूत सुविधा असतील.
पुढे मंत्री गडकरी म्हणाले, प्रत्येक घरात सदस्य ३ पण वाहने ५ आहेत. इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढत आहे. येत्या दोन वर्षात पेट्रोल व इलेक्ट्रीक वाहनाची किमत समान असेल. तसेच केंद्र सरकार हरित महामार्ग तयार करणार आहे. दिल्ली- मुंबई महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या १२ तारखेला त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन होणार आहे. या महामार्गामुळे मुंबई-दिल्ली अंतर १२ तासांत पूर्ण करता येईल. प्रवास अधित सुलभ होणार आहे. दिल्ली ते जयपूर अंतर दोन तासांत होईल. दिल्लीहून डेहराडून अंतर दोन तासांत पूर्ण करता येईल. यासह दिल्ली- मुंबई महामार्गातील अनेक रस्त्यांवरील प्रवासाची वेळ कमी होणार आहे. यावेळी मंत्री गडकरी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचीही माहिती दिली.