नवी दिल्ली : देशातील गरिबीबाबत एक संशोधन समोर आले आहे. भारतात अत्यंत गरिबांच्या संख्येत मोठी घट झाल्याचा निष्कर्ष जागतिक बँकेने पॉलिसी रिसर्च वर्किंग पेपर या संशोधनातून काढला आहे. त्या संशोधनातील अहवालानुसार भारतात मागील आठ वर्षांत देशातील गरिबीत १२.३ टक्क्यांनी घट झाली आहे. या माध्यमातून भारताने अत्यंत गरिबीचे जवळजवळ उच्चाटन केले आहे, असेही जागतिक बँकेने नमूद केले आहे.
जागतिक बँकेच्या पॉलिसी रिसर्च अहवालामध्ये म्हटले आहे की, २०११ मध्ये भारतात गरिबांची संख्या २२.५ टक्के होती, जी २०१९ मध्ये १०.२ टक्क्यांवर आली आहे. देशात सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध अन्न योजनांमुळे उपभोगातील असमानता गेल्या ४० वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहचली आहे.
शेतकर्यांच्या उत्पन्नात दरवर्षी १० टक्के वाढ
हा अहवाल अर्थशास्त्रज्ञ सुतीर्थ सिन्हा रॉय आणि रॉय व्हॅन डेर वेड यांनी संयुक्तपणे लिहिला आहे. संशोधन पत्रानुसार २०११ ते २०१५ दरम्यान भारतातील अत्यंत गरिबीचा दर ३.४ टक्क्यांनी कमी झाला. २०१५ ते २०१९ दरम्यान अत्यंत गरिबीचा दर ९.१ टक्क्यांनी घसरला. २०११-१५च्या तुलनेत हा दर २.६ पट अधिक आहे. अहवालानुसार २०१३-१९ दरम्यान सर्वांत लहान शेती असलेल्या शेतकर्यांचे उत्पन्नदेखील दरवर्षी १० टक्के दराने वाढले.
अहवालानुसार गरिबीच्या दरात घट होण्याचा थेट संबंध रोजंदारीच्या वाढीशी आहे. २०१७-१८ या काळात गरिबीत सर्वाधिक घट झाली. या काळात असंघटित कामगारांच्या वेतनात सर्वाधिक वाढ झाली. २०११पासून रोजंदारीमध्ये झपाट्याने वाढ झाली आणि त्यामुळे गरिबीचे प्रमाण कमी होऊ लागले.