देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) आज (गुरूवार) चेन्नईमध्ये ३१ हजार कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला आहे. मोदींनी जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये ३१ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये रेल्वे (Railway), पेट्रोलियम, गृहनिर्माण आणि रस्ते यासारख्या प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांचा समावेश आहे.
पंतप्रधान आवास योजना-शहरी अंतर्गत ११६ कोटी रुपये खर्चून ‘लाइट हाउस प्रोजेक्ट-चेन्नई’ अंतर्गत बांधण्यात आलेल्या ११५२ घरांचे उद्घाटनही मोदींनी केले. दक्षिण तामिळनाडूमधील ७५ किमी लांबीचा मदुराई-टेनी, ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आला आहे, यामुळे या प्रदेशातील संपर्क वाढेल आणि पर्यटनाला चालना मिळेल. याशिवाय, नैसर्गिक वायू पाइपलाइन प्रकल्पांमुळे ग्राहक आणि उद्योगांना मोठा फायदा होईल. यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव उपस्थित होते.
It is always special to be in Tamil Nadu. Speaking at launch of development initiatives in Chennai. https://t.co/YFQoEiySIj
— Narendra Modi (@narendramodi) May 26, 2022
हे ठिकाण खास असून येथील लोक, येथील संस्कृती आणि भाषा अप्रतिम आहे. तुम्हाला माहिती असेल की, यावेळी भारताने स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली होती, परंतु आपण जिंकलेल्या १६ पदकांपैकी ६ पदकं तामिळनाडूच्या तरुणांनी जिंकली आहेत, असे मोदी म्हणाले.
लाईट हाऊस प्रकल्पांतर्गत घर मिळणार, सर्वांचे अभिनंदन
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी त्या सर्व लोकांचे अभिनंदन करू इच्छितो की, ज्यांना पीएम आवास योजनेंतर्गत चेन्नईत लाइट हाऊस प्रकल्पांतर्गत घरं मिळणार आहेत. आमच्यासाठी हा एक अतिशय समाधानकारक प्रकल्प आहे. आमचे सरकार मोठ्या योजनांमध्ये पूर्णता (100% कव्हरेज) मिळविण्यासाठी काम करत आहे. कोणतेही क्षेत्र घ्या- शौचालये, गृहनिर्माण, आर्थिक समावेश… आम्ही परिपूर्णतेच्या दिशेने काम करत आहोत.
काही वर्षांपूर्वी रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधांबाबत बोलले जात होते. आज आम्ही भारताच्या गॅस पाइपलाइन नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी काम करत आहोत. प्रत्येक गावात हायस्पीड इंटरनेट पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे. पाच रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होत असल्याचा मला विशेष आनंद होत असल्याचे मोदी म्हणाले.
हेही वाचा : पश्चिम बंगालमधील विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल नसून मुख्यमंत्री असणार; ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय