आमचे सरकार अतिशय पारदर्शकपणे काम करत असून, सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत विनाअडथळा पोहोचत आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत. कुणाच्याही मध्यस्थीशिवाय हे काम होत आहे. कुणाचेही पैसे कापले जात नाहीत. कधीकाळी कुठला पंजा होता, त्यावेळी एका रुपयातून तो 85 पैसे घासून घेत होता. परंतु आता कुठल्याही पंतप्रधानाला बोलावं लागणार नाही की मी 1 रुपया पाठवतो तर 15 पैसे पोहोचतात, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिन येथील पॉट्सडेमर प्लॅट्झ या थिएटरमध्ये जर्मनीतील भारतीय समुदायाला संबोधित केले आणि संवाद साधला. विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांचा समावेश असलेल्या जर्मनीतील यशस्वी भारतीय समुदायातील 1600 हून अधिक सदस्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत आणि समाजातील त्यांच्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. जागतिक स्तरावर भारतीय उत्पादनांचा प्रचार करून भारताच्या वोकल फॉर लोकल उपक्रमात योगदान देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. तसेच काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा आपण भारतीयांबाबत भाष्य करतो तेव्हा भारतात राहणारी जनताच नव्हे, तर तुम्हीही त्यात सामील होतात. 21व्या शतकातील हा काळ भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती काही लक्ष्य समोर ठेवते, तेव्हा देश नव्या मार्गाने चालत इच्छित स्थळ गाठू शकतो, आजचा भारत त्याच निर्धाराने पुढे जात आहे.
भारतीय जनतेने एक बटण दाबून 30 वर्षांनंतर 2014 मध्ये पूर्ण बहुमताचे सरकार निवडून दिले आणि देशातील राजकीय अस्थिरता संपवली. भारतीय मतदारांची ही ताकद आहे. याच ताकदीच्या जोरावर देश प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. याआधी तुम्ही जिथे जाल तिथे काम सुरू असल्याचा फलक लावलेला दिसायचा. आता देशही तोच आहे, फाईलही तीच आहे. सरकारी यंत्रणाही तीच आहे, पण देश बदलला आहे. आता भारत लहान विचार करत नाही. भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटी सर्वात वेगवान आहे. 6 लाख गावे ऑप्टिकल फायबरने जोडली गेली आहेत. 5जी देखील सुरू होत आहे, असेही मोदी म्हणाले.