पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला विशेष मुलाखत दिली आहे. यामध्ये श्रीनगर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये जी-20 बैठकीवर चीन आणि पाकिस्तानच्या आक्षेपाला बगल देत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आम्ही देशाच्या प्रत्येक भागात बैठका घेऊ शकतो. या मुलाखतीत त्यांनी अर्थव्यवस्थेवरही भाष्य केले. ते म्हणाले, ‘मला खात्री आहे की 2047 पर्यंत आपला देश विकसित देशांपैकी एक होईल.’ (Prime Minister Narendra Modis reply to China All claims on Arunachal Pradesh And Jammu and Kashmir dismissed in one sentence G 20)
विकसित भारतात भ्रष्टाचार, जातिवाद आणि सांप्रदायिकतेला थारा नसल्याचं मोदी म्हणाले. त्यांनी गेल्या आठवड्यात पीटीआयला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सांगितले की, बहुतांश विकसित अर्थव्यवस्था आर्थिक मंदी, तीव्र टंचाई, उच्च चलनवाढ आणि लोकसंख्येचे वाढते वय या समस्यांना तोंड देत असताना, प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश भारत आहे.
मोदी म्हणाले, ‘जगाच्या इतिहासात प्रदीर्घ काळ भारत ही जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक होती. नंतर वसाहतवादाच्या प्रभावामुळे आपली जागतिक पोहोच कमी झाली. पण आता भारत पुन्हा एकदा पुढे जात आहे. जगातील दहाव्या ते पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यापर्यंत आपण मोठी झेप घेतली आहे.
पंतप्रधान म्हणाले की, 2014 पूर्वीच्या तीन दशकांमध्ये देशात अनेक सरकारे अस्थिर होती, त्यामुळे ते फार काही करू शकले नाहीत. पण गेल्या काही वर्षांत देशात स्थिर सरकार, अनुकूल धोरणे आणि सरकारच्या एकूण दिशा स्पष्टतेमुळे जनतेने (भाजपला) निर्णायक जनादेश दिला आहे. या स्थिरतेमुळेच गेल्या नऊ वर्षांत अनेक सुधारणा अंमलात आल्या आहेत.
मोदी म्हणाले की, अनेक काळ भारत हा एक अब्जाहून अधिक भुकेल्या लोकांचा देश मानला जात होता, पण आता भारत हा एक अब्जाहून अधिक महत्त्वाकांक्षी मनांचा, दोन अब्जाहून अधिक कुशल हातांचा आणि करोडो तरुणांचा देश मानला जातो.’ ते म्हणाले की 100 हून अधिक युनिकॉर्नच्या उपस्थितीसह भारत हे स्टार्टअप कंपन्यांचे तिसरे सर्वात मोठे केंद्र आहे आणि आज जगभरात त्यांच्या अंतराळ क्षेत्रातील कामगिरीचा गौरव केला जात आहे.
पंतप्रधान म्हणाले की, मला खात्री आहे की नजीकच्या भविष्यात आपण जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असू. मला विश्वास आहे की 2047 पर्यंत आपला देश विकसित देशांपैकी एक होईल.
(हेही वाचा: काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल )