काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज लोकसभेत कृषी कायद्यांवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. केवळ दोन उद्योगपतींसाठी केंद्र सरकारने कृषी कायदे केले असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधानरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरुन विरोधकांवर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदींच्या भाषणाला उत्तर देताना राहुल गांधी आज लोकसभेत चांगलेच आक्रमक झाले. कृषी कायदे शेतकरी हिताचे नाही आहेत. बाजार समित्या बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. दरम्यान, राहुल गांधीच्या भाषणावेळी भाजपच्या खासदारांनी गदारोळ घातला. मात्र, राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात केंद्र सरकारचा चांगलाच समाचार घेतला.
राहुल गांधी यांनी आज गुरुवारी लोकसभेत कृषी कायद्यांसह शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. शेतकरी मागे हटणार नाहीत. हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांचं नाही आहे. तर हे आंदोलन संपूर्ण भारतीयांचं आहे. शेतकरी मागे हटणार नाहीत, तुम्हाला कृषी कायदे मागे घ्यावे लागतील, लिहून घ्या, असं राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितलं. यावेळी राहुल गांधी यांनी उद्योगपतींवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं. काही वर्षांपूर्वी कुटुंब नियोजनाचा एक नारा होता. हम दो, हमारे दो, असा नारा होता. कायद्याबाबत बोलतो. आज काय होतंय? जसा कोरोना दुसऱ्या रुपात येतोय, तसाच हा नारा आता दुसऱ्या रुपात येतोय. आज या देशाला फक्त चार लोक चालवतात. हम दो और हमारे दो. नाव सर्वांना ठावूक आहे. हा देश चार लोक चालवतात ‘हम दो और हमारे दो’, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
“कायदे लागू झाल्यानंतर देशातील शेतकरी, दुकानदार, छोटे व्यापारी यांचे व्यवसाय बंद होतील. फक्त दोन लोक देश चालवणार. अनेक वर्षांनी भारतातील लोक भूकबळीचे शिकार ठरतील. लोकांना रोजगार मिळणार नाहीत. नोटबंदीपासून मोदींनी याची सुरुवात केली. गरीब, शेतकरी, मजुरांकडून पैसे घेऊन खिशात टाकण्याची योजना होती. नंतर जीएसटी…गब्बर सिंग टॅक्स आणला. नंतर पुन्हा तेच शेतकरी, व्यापारी, दुकानदारांवर आक्रमण केलं. कोरोना संकटात मजूर बसचं तिकीट मागत होते पण देण्यात आलं नाही,” असं म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.