Rahul Gandhi Alert by Security Agency | नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या अंतिम टप्प्यावर आहे. काहीच दिवसांत ते काश्मीरला पोहोचणार आहेत. मात्र, काश्मीरला जाण्याआधीच सुरक्षा यंत्रणांनी (Security Agency) मोठा अलर्ट जारी केला आहे. काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी पायी चालू नये, असा सल्ला सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे. राहुल गांधींना सुरक्षित ठेवण्याकरता एक विस्तृत योजना आखण्यात आली आहे. या योजनेनुसार त्यांनी चालत पदयात्रा करण्यापेक्षा वाहनांचा वापर करून यात्रा पूर्ण करावी. एनडीटीव्हीने संबंधित वृत्त दिले आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात भारत जोडो यात्रा १९ जानेवारीला जम्मू-काश्मीरला पोहोचणार आहे. 25 जानेवारी रोजी राष्ट्रध्वज फडकवून ते बनिहालमध्ये प्रवेश करतील. तर, २७ जानेवारी रोजी अनंतनागमार्गे श्रीनगरमध्ये प्रवेश करतील. श्रीनगरमध्ये असताना राहुल गांधींसोबत फक्त मूठभर लोकांनी प्रवास करावा, असा सल्ला सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे.
सुरक्षा यंत्रणांची योजना काय?
राहुल गांधी १९ जानेवारी रोजी लखनपूरमध्ये प्रवेश करतील आणि तेथे रात्री थांबल्यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी कठुआच्या हातली मोर येथून पुढे जातील. पुन्हा रात्री चडवळ येथे ही यात्रा थांबेल. २१ जानेवारीला सकाळी हिरानगर ते दुग्गर हवेलीच्या दिशेने यात्रा निघेल आणि 22 जानेवारीला विजयपूर ते सटवारीकडे जाईल.
काश्मीरमधील काही भाग संवेदनशील आहेत, त्यामुळे अशा प्रस्तावित भागांतून राहुल गांधी यांनी पायी यात्रा करण्यापेक्षा वाहनाने प्रवास करावा. तसंच, फक्त ओळखीच्या लोकांनाच सोबत ठेवावे असा सल्ला सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे.
हेही वाचा – भारत जोडो यात्रेदरम्यान खासदार चौधरी संतोख सिंह यांचे निधन, यात्रा तात्पुरती थांबवली
भारत जोडो यात्रेदरम्यान पंजाबचे काँग्रेस खासदार चौधरी संतोख सिंह यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पदयात्रेचा पंजाब टप्पा बुधवारी फतेहगढ साहिबमधील सरहिंद येथून सुरू झाला.