नवी दिल्ली : खादीवरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले आहे. खादीचा धागा स्वावलंबी भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणास्त्रोत बनू शकतो, असे पंतप्रधान मोदी यांनी साबरमती येथे म्हटले होते. त्यावरून टीका करताना राहुल गांधी यांनी मोदी यांच्या शब्द आणि कृतीमध्ये तफावत असल्याचे सांगितले.
‘Khadi for Nation’ but Chinese Polyester for National flag! 🇮🇳
As always, the words and actions of the PM never match.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 28, 2022
पंतप्रधान मोदी यांनी काल साबरमती नदीवरील ‘अटल ब्रिज’चे उद्घाटन केले. सायंकाळी येथील खादी महोत्सवाच्या कार्यक्रमालाही मोदी उपस्थित राहिले. त्यावेळी मोदी म्हणाले, इतिहास साक्षी आहे की खादीचा एक धागा स्वातंत्र्य चळवळीचे बळ बनला होता. त्याने गुलामीच्या बेड्या सुद्धा तोडल्या. खादीचा हाच धागा विकसित भारत निर्माण करणार आहे. हाच खादीचा धागा स्वावलंबी भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणास्रोत बनू शकतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
आज भारतातील टॉपचे फॅशन ब्रॅण्ड खादीशी संलग्न होण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. त्याचबरोबर आज भारतात खादीचे विक्रमी उत्पादन होत आहे आणि विक्रमी विक्रीसुद्धा होत आहे. मागील 8 वर्षांत खादीच्या विक्रीत चार पटीने वाढ झाली आहे, असेही त्यांनी म्हटले होते. यावरून राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रासाठी खादी, पाण राष्ट्रध्वजासाठी चीनचे पॉलिस्टर वापरले जाते, असा उल्लेख करून मोदी यांच्या बोलण्यात आणि कृतीत तफावत असते, असा टोला त्यांनी लगावला.