काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील आक्षेपार्ह टिप्पणीसंदर्भातील नोटिशीवर लोकसभा सचिवालयाकडे सविस्तर उत्तर सादर केले आहे. राहुल गांधी यांनी 7 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शन चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. यासंदर्भात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र सुपूर्द केले, यानंतर सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस बजावत 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे सांगितले होते.
राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या टिप्पणीचे समर्थन करण्यासाठी विविध युक्तीवाद आणि कायद्यांचा हवाला देत अनेक पानांमध्ये तपशीलवार उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांनी 7 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेदरम्यान हिंडेनबर्ग-अदानी मुद्द्यावरून मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मात्र राहुल गांधींचे ते विधान लोकसभेच्या पटलावरून काढून टाकले.
भाजप खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिले पत्र
भाजप खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी यांचे विधान दिशाभूल करणारे, अपमानास्पद, असभ्य, असंसदीय, असभ्य तसेत सभागृह आणि पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा अपमान करणारे असल्याचे म्हटले आहे. तसेच हे वर्तन सभागृहाचे अवमान करणार असल्याबरोबरचं ते सभागृहाच्या आणि सदस्यांच्या विशेषाधिकारांचे उल्लंघन आहे.
विशेषाधिकार भंग आणि सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. दुसरीकडे नुकतेच वायनाड लोकसभा मतदारसंघातील एका सभेला संबोधित करताना, गांधी यांनी सभागृहातील चर्चेदरम्यान आपल्या भाषणातील अनेक टिप्पण्या हटविण्याच्या निर्णयावर टीका केली होती.