पश्चिम बंगाल : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. 25 जानेवारी रोजी ही यात्रा आसाममध्ये आली. तिथून ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचली. आता पुढच्या टप्प्यात ही यात्रा झारखंडमध्ये जाणार आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा आणि मिलिंद देवर यांच्यावर टीका केली आहे. हिंमत बिस्वा सरमा आणि मिलिंद देवरासारख्या नेत्यांनी पार्टी सोडलीच पाहिजे. अस मला वाटतं. कारण ते विचारधारेशी सहमत नाहीत, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं.
माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसने जे नियम घालून दिलेत त्याचं संरक्षण केलं पाहिजे. सिद्धांतांचं पालन केलं पाहिजे. मला वाटतं हिमंत बिस्वा सरमा आणि मिलिंद देवरा सारख्या लोकांनी काँग्रेसमधून निघून जावं. यांच्या सारखे नेते काँग्रेसमध्ये नकोच. हिमंत हे एका विशेष प्रकारच्या राजकारणाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. हे काँग्रेसचं राजकारण नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
मिलिंद देवरा यांनी काँग्रेससोडून शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाची भाजपसोबत युती आहे. तर दुसरीकडे हिमंत बिस्वा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हिमंत बिस्वा सरमा यांनी 2014मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. हिमंत बिस्वा सरमा आसामचे मुख्यमंत्री आहेत. दुसरीकडे पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही पक्षांतर्गत वादाला कंटाळून काँग्रेस सोडली, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्यावेळी पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आलं.
भाजपचं सरकार आल्यापासून काँग्रेसला अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसमधून इतर पक्षात प्रवेश केला. कपिल सिब्बल, ज्योतिरादित्य सिंधिया, सुनील जाखड, प्रियंका चतुर्वेदी, हार्दिक पटेल, सुष्मिता देव आणि आरपीएन सिंह आदी नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. काँग्रेस सोडताना प्रत्येकांनी वेगवेगळी कारणे दिली.
भाजपचा पराभव करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या इंडिया आघाडीचं अस्तित्व धोक्यात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपची साथ दिली. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला अधिक जागा देण्यास नकार दिला. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनीही काँग्रेसला अधिक जागा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचं अस्तित्व निवडणुकीआधीच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत.