कोरोनाचं संकट जेव्हापासून सुरू झालं आहे, तेव्हापासून जगभरातल्या अर्थव्यवस्थांनी खालच्या दिशेने प्रवास सुरू केलेला पाहायला मिळाला आहे. भारतात देखील तशीच परिस्थिती असून अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान कोरोना काळात पाहायला मिळालं आहे. मात्र, असं असतान इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेचं जास्त नुकसान झाल्यामुळे त्यावर मोठी चर्चा देशात सुरू असल्याचं दिसून येत आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला जाब विचारायला सुरुवात केली आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून भाजपवर या मुद्द्यावरून वारंवार निशाणा साधला जात आहे. बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी तिखट शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट कशी लावायची आणि कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक कशी वाढवायची, हे यांच्याकडून शिकावं’, अशा शब्दांत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपप्रणीत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका करण्यासाठी आपल्या ट्वीटरवर एक तक्ता पोस्ट केला आहे. यामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये असलेला जीडीपी (GDP) आणि कोरोनामुळे दर दहा लाख लोकसंख्येमागे होणाऱ्या मृतांचा आकडा यांची तुलना केली आहे. यात बांगलादेश ३.८ टक्के जीडीपीसह सर्वात वर असून भारत वजा १०.३ टक्के जीडीपीसह सर्वात खालच्या स्थानी आहे. त्यासोबतच दर १० लाख लोकसंख्येमागे सर्वाधिक ८३ मृत्यू भारतात होत असल्याचं देखील या तक्त्यामध्ये दाखवण्यात आलं आहे. याच फोटोला राहुल गांधींनी ‘देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट कशी लावायची आणि कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक कशी वाढवायची, हे यांच्याकडून शिकावं’, अशी कॅप्शन दिली आहे.
How to completely destroy an economy and infect the maximum number of people really quickly. pic.twitter.com/5kbMpmnIpZ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 19, 2020
या तक्त्यामध्ये जीडीपीमध्ये बांगलादेश खालोखाल चीन (१.०%), व्हिएतनाम (१.६%), नेपाळ (०.०%), पाकिस्तान (-०.४%), इंडोनेशिया (-१.५%), श्रीलंका (-४.६%), अफगाणिस्तान (-५.०%), मलेशिया (-६.०%), थायलंड (-७.१%) आणि भारत (-१०.३%) अशी क्रमवारी आहे.