दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर दिल्ली महानगरपालिकेनं अतिक्रमणविरोधी कारवाई सुरु केली. या कारवाईमध्ये अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. यामध्ये जवळपास ७ ते ८ दुकानं पाडण्यात आली. मात्र, हे तोडकाम थांबवण्याचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली महापालिकेला दिले आहेत. तसेच या प्रकरणी आता उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, द्वेषाचे बुलडोझर बंद करा, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कारवाईला विरोध करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
देशात सध्या निर्माण झालेल्या कोळसा तुटवड्यावर राहुल गांधी यांनी भाष्य केलं आहे. भारताकडे केवळ ८ दिवसांच्या कोळशाचा साठा शिल्लक आहे. तसेच मंदीचं सावट अत्यंत गहिरं होत चाललं आहे. ऊर्जा निर्मिती प्रकल्प बंद पडल्यानं लघु उद्योग उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक रोजगार बंद होत आहेत. त्यामुळं द्वेषाचे हे बुलडोझर आता बंद करा आणि पावर प्लान्ट सुरु करा, असं राहुल गांधी म्हणाले.
दिल्ली महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे. तसेच पोलिसांचं संरक्षण देखील केलं जातंय. मात्र या परिसरात तणावपूर्ण शांतता पहायला मिळतेय. तोडकाम त्वरीत थांबवा, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्ली महानगरपालिकेला दिला आहे. कारण कोणत्याही प्रकारची नोटीस स्थानिकांना देण्यात आली नव्हती. यामध्ये काही राजकीय अँगल आहेत का, असे प्रश्न याचिकाककर्त्यांनी उपस्थित केले होते. त्यामुळे या तोडकामाला स्थगिती देण्यात आली असून या सर्व प्रकरणावर उद्या सविस्तर सुनावणी करू, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.