नवी दिल्ली – गुजरातमधील बिलकिस बानो प्रकरणातील ११ बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या सुटकेवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधानांच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक संपूर्ण देशाला दिसत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. गेल्या सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी महिलांचा आदर हा भारताच्या प्रगतीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे म्हटले असताना या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्याने पंतप्रधानांवर निशाणा साधला. यावेळी नारी शक्ती’ला पाठिंबा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
राहुल गांधी काय म्हणाले –
गुजरातमधील बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची सोमवारी सुटका करण्यात आली. आता राहुल गांधी यांनी या प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी याबाबत सोशल मीडियावर ट्विट करून लिहिले, ज्यांनी ५ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार केला आणि तिच्या ३ वर्षाच्या मुलीची हत्या केली त्यांना ‘आझादी के अमृत महोत्सवा’दरम्यान सोडण्यात आले. तुम्ही महिलांना काय संदेश देत आहात? पंतप्रधान, तुमच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक संपूर्ण देशाला दिसतोय.
5 महीने की गर्भवती महिला से बलात्कार और उनकी 3 साल की बच्ची की हत्या करने वालों को ‘आज़ादी के अमृत महोत्सव’ के दौरान रिहा किया गया।
नारी शक्ति की झूठी बातें करने वाले देश की महिलाओं को क्या संदेश दे रहे हैं?
प्रधानमंत्री जी, पूरा देश आपकी कथनी और करनी में अंतर देख रहा है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 17, 2022
काय आहे बिल्किस बानो प्रकरण –
2002 मध्ये, 3 मार्च रोजी गोध्रा दंगलीनंतर, दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील रंधिकपूर गावात जमावाने बिलकिस बानोच्या कुटुंबावर हल्ला केला. त्यावेळी बिलकिस पाच महिन्यांची गर्भवती होती. बिल्किसवर सामूहिक बलात्कार झाला. यासोबतच त्यांच्या कुटुंबातील सात जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.