रेल्वेने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या मोहिमेची माहिती दिली. ५२३१ रेल्वे डब्यांचे आयसोलेशन वार्डमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे, अशी माहिती रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली. आरोग्य मंत्रालयाने ६ मे रोजी दिलेल्या सूचनांच्या आधारे रेल्वे आयसोलेशन सेंटर तयार करण्याचं काम करीत आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना रेल्वे कोचमधील आयसोलेशन केंद्रात ठेवलं जाईल. कोरोनाच्या संशयित किंवा पुष्टी झालेल्या रूग्णांसाठी स्वतंत्र कोच तयार केले जातील. अशा प्रत्येक कोचमध्ये ८ केबिन असतील. रेल्वेने यासाठी नोडल अधिकारी केले आहेत, जे वेगवेगळ्या राज्यात कोविड केअर बेड्स बद्दल माहिती देतील. अशी १३० स्थानके आहेत जिथे रेल्वेकडे वैद्यकीय पथक नाहीत. म्हणून राज्यांना पॅरामेडिकल आणि वैद्यकीय पथके उपलब्ध करुन देण्यास सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा – गांधी कुटुंबाचं राष्ट्रीय हितासाठी योगदान नाही – स्मृती इराणी
रेल्वेच्या आयसोलेशन बेड्सचे व्यवस्थापन राज्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी करतील. ज्या ठिकाणी आयसोलेशन केंद्रे बांधली जातील, त्या भागातील रुग्णालयाशी संबंध असतील. यासाठी रुग्णवाहिकादेखील ठेवली जाणार आहे. दिल्लीच्या शकूर कॉलनीत ५० डब्बे तयार करण्यात आले आहेत. हे सर्व डब्बे गरजेनुसार तयार आहेत. वाढते तापमान पाहता, केंद्राच्या छतावर इन्सुलेशन करण्याची देखील तयारी आहे. रेल्वेने सांगितलं की, अवघ्या २४ तासात काही व्हेंटिलेटर नागपूरहून मुंबईला आणण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेचा भारतीय पोस्टशी करार असल्याने हे घडलं.