राज्यसभेचे ३१ जानेवारी रोजी सुरु झालेलं सत्र आज, बुधवारी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. हे संपूर्ण सत्र विरोधकांच्या विविध आंदोलनं आणि घोषणांसाठी ओळखलं जाईल. दरम्यान, काही महत्त्वाच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यासाठी सरकारकडे हे अखेरचे सत्र होते. यामध्ये बहुप्रतिक्षित तिहेरी तलाक विधेयक २०१८ आणि नागरिकत्व विधेयक २०१९ यांचा समावेश आहे. तिहेरी तलाक विधेयकावरून राजकीय वाद सुरू आहे. काँग्रेसने सत्ता आली तर तिहेरी तलाक कायदा संपुष्टात आणले जाईल, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, राज्यसभेत वित्त विधेयक आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना पारित झाला.
Rajya Sabha adjourned sine die. pic.twitter.com/MFLvkcKpAO
— ANI (@ANI) February 13, 2019
प्रलंबित विधेयक पुन्हा मांडावे लागणार
लोकसभा प्रक्रियेनुसार लोकसभेत सादर केलेले कोणतेही विधेयक जर इतर सदनात प्रलंबीत राहिले तर ते संसदेच्या कार्यकाळासोबतच संपुष्टात येईल. तसेच कोणतं बिल राज्यसभेत सादर झालं असेल आणि मंजूरदेखील झालं असेल पण लोकसभेत अडकले असेल तरीही ते रद्द होते. नागरिकत्व विधेयक आणि तिहेरी तलाक विधेयक आज अखेरच्या दिवशीदेखील मंजूर झाले नाही. आता पुढील सरकारच्या कार्यकाळात पुन्हा एकदा त्याला लोकसभेकडून मंजूर करून घ्यावे लागेल.
२० मिनिटे विना चर्चा अभिभाषण संमत
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव आणि अंतरिम अर्थसंकल्प २०१९-२० संमत झाल्यानंतर आज राज्यसभेची कार्यवाही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. राष्ट्रपती अभिभाषणावर चर्चेसाठी १० तास, अर्थसंकल्पावर ८ तास आणि २ विधेयकावर चर्चा करण्यासाठी २ तास निश्चित करण्यात आले होते. मात्र, अखेरच्या दिवशी २० मिनिटे विना चर्चा अभिभाषण आणि अंतरिम अर्थसंकल्प संमत करण्यात आला.