काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर वारंवार बोचरी टीका करण्यात येत असते. कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी देशाच्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर आता भाजपा भडकले असून भाजपचे ज्येष्ठ नेते रवीशंकर प्रसाद यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “देशाच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यावर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी. हे अत्यंत लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना याबद्दल माफी मागावी लागेल”, असं रवीशंकर प्रसाद प्रतिक्रिया देताना म्हणाले. “देश तोडण्याचे काम करणारी ही पुरावा टोळी असून या नेत्यांना काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यांचा पाठिंबा आहे.” असं देखील ते यावेळी म्हणाले.
पाकिस्तानवर देशाने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी प्रश्न उपस्थित केले होते. “सर्जिकल स्ट्राईक करून आम्ही खूप लोक मारले, असं ते सांगत असतात. पण आजपर्यंत याचा कोणताही पुरावा नाही.” असं वक्तव्य करीत सरकार खोटं बोलत असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केलाय. तसंच जम्मूमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान एका जाहीर सभेबाबत बोलताना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले की, सरकारला निर्णय घ्यायचे नाहीत. कोणते प्रश्न सोडवायचे नाहीत. काश्मीर फाइल्स सारखे चित्रपट बनत राहावेत आणि हिंदू -मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवावा म्हणून ही समस्या कायम ठेवायची आहे.”
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याचा भाजपचे ज्येष्ठ नेते रवीशंकर प्रसाद यांनी खरपूस समाचार घेतलाय. “हे अत्यंत लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना माफी मागावी लागेल. देश तोडण्याचे काम करणारी ही टोळी असून, या नेत्यांना काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यांचा पाठिंबा आहे. दिग्विजय सिंह हे काही सामान्य नेते नाहीत, ते दहा वर्षे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. सरचिटणीसपदावरही राहिले आहेत, असे सांगत, कृपया देशाच्या सैन्याचा अपमान करू नका, असे आवाहन त्यांनी केले.
Shri @rsprasad addresses a press conference at party headquarters in New Delhi. https://t.co/6rdfmJaZnK
— BJP (@BJP4India) January 24, 2023
यावेळी रवीशंकर प्रसाद राहुल गांधींना सवाल केले आहेत. “राहुल गांधींना माझा प्रश्न आहे की, तुमच्यासोबत असणारे लोक देश तोडण्यात मग्न आहेत आणि तुम्ही गप्प का आहात? तुमच्या नेत्यांच्या या वक्तव्यामुळे दहशतवादाच्या सूत्रधारांचे मनोधैर्य वाढते, याचा कधी विचार केला आहे का? ही ‘भारत जोडो यात्रा’ आहे की ‘भारत तोडो यात्रा’? असा सवाल त्यांनी केलाय.