भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलन समितीच्या बैठकीने आपले पत धोरण जाहीर केलं असून त्यामध्ये व्याज दरात कोणताही बदल केला नाही. म्हणजेच आरबीआयने पुन्हा एकदा रेपो दर स्थिर ठेवला असून तो रेपो दर ४ टक्क्यांवर स्थिर आहे. म्हणजेच आरबीआयच्या या निर्णयामुळे सामान्य ग्राहकांचा ईएमआय कमी होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. ग्राहकांना त्यांचा इएमआय कमी होण्यासाठी आता अजून काही काळाची वाट पहावी लागणार आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अर्थव्यवस्था सुधारत आहे. कोरोना महामारी दरम्यान, मागणी आणि पुरवठा यांचे संतुलन बिघडले आहे, जे हळूहळू पूर्ववत आणले जात आहे. एमपीसीच्या सर्व सदस्यांच्या एकमताने दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आरबीआयच्या मते, लसीकरण आणि पॉलिसी सपोर्ट, एक्सपोर्टच्या सुधारणेमुळे अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सुधारेल. परंतु, RBI ने महागाआईच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त केली आहे. यासह, आरबीआयने GDP च्या वाढीच्या अंदाजाबद्दल असे सांगितले की, ते 9.5 टक्के राहणार आहे. यासह हाय फ्रिक्वेंसी इंडिकेटर, गुंतवणूक आणि एक्सटरनल डिमांड हे सर्व सुधारण्याची चिन्हे असल्याचे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे.
Reserve Bank of India keeps repo rate unchanged at 4%, maintains accommodative stance pic.twitter.com/fAhHBio4OR
— ANI (@ANI) August 6, 2021
कोरोना महामारी पाहता आरबीआयने महत्वाच्या घटकांमध्ये म्हणजे रेपो दर, रिव्हर्स रेपो दरामध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे सध्याचा रेपो दर हा ४ टक्केच राहील तर रिव्हर्स रेपो दर हा ३.३५ टक्के कायम राहिल. तसेच मार्जिनल स्टॅन्डिंग फॅसिलिटी रेट हा ४.२५ टक्के आणि बॅंक दर हा ४.२५ टक्के असणार आहे. तर या रिझर्व्ह बँकेच्या चलन समितीच्या बैठकीनंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. काही तासांच्या ट्रेडिंगनंतर सेन्सेक्स साधारण २५० अंकांनी घसरला आणि तो ५४ हजार ३०० अंकांवर आला. या काळात रिलायन्सचा शेअर सर्वाधिक घसरला असल्याचे सांगितले जात आहे.
कोरोनाचा मोठा आर्थिक फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला असून गेल्या ४० वर्षात पहिल्यांदाच जीडीपीने निच्चांक गाठला असून तो २०२०-२१ या वर्षासाठी -७.३ ने घसरला होता. मात्र आता भारतीय अर्थव्यवस्था कोरोना महामारीच्या संकटातून सावरत असून लसीकरणाची गती वाढेल तसेच अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचा विश्वास आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला.