देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. अनेक तरुण शिक्षण घेऊन देखील बेरोजगार आहेत. त्यातच आता आरबीआयचा देखील एक अहवाल आला आहे. या अहवालात देशातील ४७ टक्के लोकांमध्ये चिंतेचं वातावरण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी येत्या १२ महिन्यांत रोजगार आणि नोकऱ्यांबाबतीत सुधारणा होईल, असा विश्वास ५२ टक्के लोकांनी दाखवल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
१३ शहरांमध्ये करण्यात आला सर्व्हे
देशातील १३ शहरांमध्ये हा सर्वे करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इंडियन कंझ्युमर कॉन्फिडन्सच्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. ५ डिसेंबर रोजी हा सर्व्हे जारी करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याची भावना असणाऱ्या लोकांची संख्या कमी झाल्याचंही उघड झालं आहे. तसेच ५३.६ टक्के लोकांना अजूनही या परिस्थितीत सुधारणा होणार असल्याचं या सर्व्हेतून उघड झाले आहे.
बाजार, अर्थव्यवस्था आणि संस्थांमध्ये सततचे बदल होत असतात ते लोकांच्या पचनी देखील पडत नाही. सध्याची अर्थव्यवस्था आणि वित्तीय क्षेत्रात जे काही सुरु आहे त्यावर नाराजी व्यक्त केल्याचे माजी मुख्य संख्याशास्त्रज्ञ प्रोणब सेन यांनी सांगितलं आहे.
तेलाच्या घसरत्या किंमती, रुपयाची घसरण आणि त्यामुळे शेअरबाजारात निर्माण झालेली अस्थिर परिस्थीतीमुळे नोकरी आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित चिंता वाढणं स्वाभाविक आहे. – सौम्य कांती घोष, स्टेट बँक ऑफ इंडिया समूहाचे मुख्य आर्थिक सल्लागार
वाचा – आरबीआयकडून रेपो रेट कायम