नागरिकत्व कायद्यावरून देशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. तेव्हा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वतः या प्रकरणी हस्तक्षेप करावा आणि हा कायदा रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यावेळी सोनिया गांधी यांनी जामिया प्रकरणी करण्यात आलेली कारवाई चुकीची असल्याचेसुद्धा म्हटले आहे. एवढेच नाही तर सध्या ईशान्य भारत आणि दिल्लीत चिंताजनक परिस्थिती असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं.
Delhi: Opposition party leaders, led by Congress interim president Sonia Gandhi, met President Ram Nath Kovind today over Jamia Millia Islamia incident. pic.twitter.com/kxLle0jFjJ
— ANI (@ANI) December 17, 2019
विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाची राष्ट्रपतींकडे धाव
सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसह आज विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने देशात विविध ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती राष्ट्रपतींना दिली. एवढेच नाही तर सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे सांगत हा कायदा रद्द करण्याची सरकारला सूचना करावी, अशी विनंती शिष्टमंडळाने राष्ट्रपतींकडे केली.