सलग १७ व्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. काल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी इंधनाच्या वाढत्या दराविरोधात आंदोलन केल्यानंतर भाजपचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी इंधनाचे दर कमी करणे आमच्या म्हणजेच सरकारच्या हातात नसल्याचे म्हटले होते. त्यावर सोशल मीडियावर लोकांनी भाजपला ट्रोल देखील केले. मात्र जे मोदी सरकारला शक्य नाही, ते नितीन गडकरी करुन दाखवतील असे त्यांच्या विधानावरुन दिसून येत आहे. छत्तीसगडमध्ये जैव इंधनाचा प्रकल्प सुरु होणार असून त्याद्वारे डिझेल ५० रुपये तर पेट्रोल ५५ रुपये प्रति लिटर मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
Our Petroleum Ministry is setting up 5 ethanol-making plants in country. Ethanol will be produced from wood products&segregated municipal waste. Diesel will be available at Rs.50 per litre & petrol alternative at Rs.55 per litre: Union Minister Nitin Gadkari in Durg #Chhattisgarh pic.twitter.com/YXCjRWJCVF
— ANI (@ANI) September 10, 2018
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी छत्तीसगडमध्ये ४ हजार २५१ कोटींच्या आठ विकासकामांचे उदघाटन केले. या कार्यक्रमावेळी गडकरी म्हणाले की, “सध्या आपण पेट्रोल आणि डिझेल आयात करण्यासाठी ८ लाख कोटी खर्च करत आहोत. रुपयाचे देखील अवमूल्यन होत आहे. त्यामुळेच केंद्रीय पेट्रोलियम खाते इथेनॉल निर्मितीचे पाच प्रकल्प स्थापित केले जाणार आहेत. तांदूळ आणि गव्हाच्या पेंढ्या, ऊस आणि महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून कारखान्यात इंधन निर्माण केले जाणार आहे. या माध्यमातून पेट्रोल ५५ आणि डिझेल ५० रुपये लिटर या दराने मिळू शकेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गडकरी पुढे म्हणाले की, आपल्या देशातला आदिवासी हा जंगलात राहणारा आहे. तो देशासाठी इथेनॉल, मिथेनॉल, जैविक इंधन निर्माण करु शकतो. ज्यामुळे आपली प्रगती होऊ शकते. छत्तीगड सरकारने अशा प्रकारचे प्रकल्पाची मागणी केली होती, ती मागणी मी मान्य केली असल्याचे गडकरी म्हणाले. तसेच राजधानी रायपूर येथे बायोटेक्नोलॉजी रिसर्च सेंटर स्थापन करण्यात यावी, जेणेकरून राज्याला पर्यायी इंधन उत्पादित करण्यासाठी मदत होऊ शकेल. इथेनॉल, मिथेनॉल आणि जैविक इंधनाचे जास्तीत उत्पादन आपण करु शकलो तर पेट्रोल,डिझेलचे दर आपोआपच कमी होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
छत्तीसगडमध्ये शेतीची प्रगती होत आहे. तांदूळ, गहू, तेलबिया आणि ऊस या पिकांचे मुबलक प्रमाणात उत्पादन होत आहे. आता छत्तीसगड जैविक इंधनाच्या उत्पादनातही पुढे येत आहे. छत्तीसगडमध्ये बनणाऱ्या जैविक इंधनापासून देहरादून ते दिल्ली असे नुकतेच एक विमान उडवले गेले आहे.