आतापर्यंत कोरोनाच्या संक्रमणापासून दूर असलेल्या बिहार राज्यात आता कोरोना आणि त्याच्या राजकारणाने वेग घेतला आहे. बिहारमधील विरोधी बाकावर बसलेले लालूपुत्र तेजस्वी यादव यांनी नितीश सरकारवर जोरदार हल्लाबोल करत बिहार कोरोनाचा ग्लोबल हॉटस्पॉट होण्याकडे वाटचाल करत असल्याचे सांगितले. तेजस्वी यादव म्हणाले की, “बिहारमध्ये जो कोरोना टेस्ट करत नाही, त्याचा रिपोर्ट मिळतोय आणि जो टेस्ट करत आहे, त्याचा रिपोर्ट बरेच दिवस मिळत नाही. राष्ट्रीय जनता दलाच्या १९ आमदारांनी कोरोना टेस्ट केली. मात्र त्यांचा रिपोर्ट आजपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे आता आम्हाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निगेटिव्ह आलेल्या रिपोर्टवरही शंका वाटते.”
तेजस्वी यादव पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री नितीश कुमार फक्त आपले पद राखण्यातच मश्गूल झाले आहेत. त्यांना बिहार मधील ना पूराची चिंता आहे, ना कोरोनाच्या महामारीची. निवडणूक ही लोकांचे जीव वाचविण्यासाठी असते, खुर्ची वाचवण्यासाठी नाही.” अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. तेजस्वी यादव यांनी बिहार सरकार कोरोनाबाधितांचे आकडे लपवत असल्याचाही आरोप केला. बिहारमध्ये कोरोनाचा मृत्यूदर वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या आकड्यांमध्ये तफावत असल्याचेही यादव म्हणाले.
Different #COVID19 numbers are being given for Bihar by Centre&state. Ppl are receiving test report even when they have not given any sample for test. Medical staff at COVID centres do not have PPE kits. We demand that state govt must give a clear picture: Tejashwi Yadav, RJD https://t.co/HGO9jCLrzt
— ANI (@ANI) July 20, 2020
सरकारवर आरोप करत असतानाच तेजस्वी यादव यांनी आता जनतेनेच स्वतःची काळजी स्वतः घ्यावी, असे म्हटले आहे. तर दुसरीकडे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांनी देखील सकारवर जोरदार तोंडसूख घेतले. लालू यादव म्हणाले की, मागच्या चार महिन्यात ४ वेळा देखील मुख्यमंत्री आपल्या निवासस्थानातून बाहेर पडलेले नाहीत.
अशी आहे बिहारची परिस्थिती
रविवारपर्यंत बिहारमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या २५,१३६ एवढी होती. यापैकी तब्बल १५,५३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ९,३९२ आहे. तर बिहारमध्ये आतापर्यंत २०८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. देशभरातील इतर मोठ्या राज्यांच्या तुलनेत बिहारची रुग्णसंख्या कमी असली तरी मागच्या १० दिवसांत कोरोचा फैलाव लक्षणीयरित्या वाढला आहे. ८ जुलै रोजी बिहारमधील कोरोनाबाधितांची संख्या १३,२७४ होती. केवळ दहा दिवसांत त्यात दुप्पट वाढ झाली.