देशाच्या राजकारणात नेहमीच बदल घडत असतात. किंवा नेतेमंडळीसुद्धा एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. अशातच बहुजन समाज पार्टीच्या म्हणजेच बसपच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेश (uttar pradesh) माजी मुख्यमंत्री मायावती (mayawati) यांनी शनिवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(rss) यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप सरकारच्या अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्मांतरण आणि लोकसंख्या धोरणाचे मुद्दे वर काढत आहे. असा थेट आरोपच मायावती यांनी केला.
लखनऊ येथील बहुजन समाज पार्टीच्या प्रदेश मुख्यालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे संमेलन पार पडले. याच संमेलनाला मायावती संबोधित करत होत्या. त्यावेळी मायावती म्हणाल्या, ”भाजपला सत्ता सोपविली पण तरीही अच्छे दिन मिळण्याचा अनुभव अद्याप जनतेला आला नाही. त्यामुळे जनता नाराज आहे”.
“देशातील प्रचंड वाढणारी महागाई, गरिबी, बेरोजगारी, हिंसाचार, तणाव आणि अव्यवस्थेने जनता त्रस्त झाली आहे आणि सगळ्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आता लोकसंख्या धोरण आणि धर्मांतरणा सारखे मुद्दे वर काढले जात आहेत, जे अतिशय चुकीचे आहे”. असंही मायावती म्हणाल्या.
यासोबतच “भाजप (bjp) सरकारच्या अपयशापासून लक्ष विचलित करण्यासाठी ही एक विचारपूर्वक केलेली रणनीती आहे, त्यामुळे सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. आरएसएस प्रत्येक निवडणुकीत भाजपला आंधळेपणाने मदत करते, मात्र भाजप सरकारच्या चुकीच्या आणि जनतेविरोधी धोरणांना कधीही उघडपणे विरोध करत नाही आणि हे दुर्दैव आहे.” असा आरोप सुद्धा मायावती यांनी केला.
हे ही वाचा – 18 लाख दिव्यांनी उजळली श्रीरामांची अयोध्या नगरी, मोदींच्या हस्ते दीपप्रज्वलन