मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात तणावाचं वातावरण सुरू आहे. या दोन्ही देशांच्या युद्धाच्या परिणाम थेट जगाच्या अर्थसंकल्पावर होताना दिसत आहे. जगभरातील शेअर बाजार सुद्धा गडगडले आहेत. त्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. कच्च्या तेल्याच्या दरात वाढ होऊन शेअर बाजारांवर देखील मोठा परिणाम झाला आहे. त्यानंतर आता भारताच्या विकास दरात सुद्धा घट होण्याची शक्यता इंटरनॅशनल रेटिंग एजन्सी असलेल्या मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने वर्तवली आहे.
भारताचा चालू विकास दर हा ९.५ टक्क्यांवरून ९.१ टक्क्यांवर येईल, असा अंदाज मूडीजने व्यक्त केला आहे. देशातील वाढते इंधनाचे दर आणि वाढत्या महागाईचा फटका देशाच्या विकासावर होणार असल्याचं मूडीजने म्हटलं आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीजने आज २०२२साठी भारताचा पूर्वीचा विकासदर ९.५ टक्क्यांनी कमी होऊन ९.१ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे भारताच्या वाढीचा अंदाज आधीच्या अंदाजापेक्षा कमी करण्यात आल्याचं या अहवालामध्ये म्हणण्यात आलं आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम हा जगभरातील देशांसहित भारतालाही मोठ्या प्रमाणात होणार असल्याचं अहवालात सांगण्यात आलंय. भारत हा कच्च्या तेलाचा मोठा आयतक देश आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर त्याचा डायरेक्ट परिणाम हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
मागील महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या २०२२-२३ च्या जागतिक मॅक्रो-इकॉनॉमिक आउटलूकच्या मागील अपडेटमध्ये एजन्सीने भारताचा वाढीव अंदाज ७ टक्क्यांवरून ९.५ टक्क्यांपर्यंत वाढला होता. परंतु २०२३ मध्ये त्याचा वाढीचा अंदाज ५.५ टक्के कायम आहे. रेटिंग एजन्सीने २०२३ मध्ये भारताची वाढ ५.४ टक्के होण्याची अपेक्षा केली आहे. त्यामुळे जागतिक समस्यांसह भारताच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.