नवी दिल्ली : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे पडसाद देशभरात उमटले होते. 1984 साली दिल्लीत प्रचंड जाळपोळ, लुटमार झाली होती. त्यावेळी एका पिता-पुत्राला जिवंत जाळण्यात आले होते. याप्रकरणी काँग्रेस माजी खासदार सज्जन कुमार यांना तब्बल 41 वर्षांनंतर म्हणजेच फेब्रुवारी 2025मध्ये दोषी ठरवत राऊज एव्हेन्यू कोर्टाने त्यांना जन्मठेची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, या शिक्षेबाबत दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समिती (DSGMC) खूश नाही. (Sajjan Kumar: Demand for execution of Sajjan Kumar from DSGMC)
सज्जन कुमार यांना त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी न्याय मिळाला आहे आणि आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. पण त्यांच्यासारख्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली असती तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया डीएसजीएमसीचे सरचिटणीस जगदीप सिंग काहलोन यांनी दिली आहे.
हेही वाचा – Neelam Gorhe : ‘विनाकारण पक्षाच्या प्रतिमेला तडा गेला,’ गोऱ्हेंविरोधात शिंदे गटातील नेत्यांची नाराजी
सरस्वती विहार प्रकरण म्हणून गाजलेल्या या हिंसाचार प्रकरणात सज्जन कुमार यांच्यासारख्या व्यक्तीला फाशीची शिक्षा न मिळाल्याने आम्हाला दुःख झाले आहे. त्यांना मृत्युदंड दिला असता तर बरे झाले असते आणि आम्हाला समाधान वाटले असते. भलेही त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असली तरी, 41 वर्षांनंतर सत्याचा विजय झाला आहे. मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, असे ते म्हणाले.
काय आहे प्रकरण?
दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात 1 नोव्हेंबर 1984 रोजी जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सज्जन कुमार हे एका जमावाचे नेतृत्व करत होते. सज्जन कुमार यांनी भडकावल्यामुळे जमावाने जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांना जिवंत जाळले होते. यानंतर जमावाने जसवंत सिंग यांच्या घरात लुटालूट केली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनाही जखमी करण्यात आले होते. याप्रकरणी पंजाबी बाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. परंतु, नंतर विशेष तपास पथकाने हे प्रकरण आपल्या हाती घेतले. 16 डिसेंबर 2021मध्ये न्यायालयाने सज्जन कुमार यांच्याविरोधात आरोप निश्चिती केली होती. या प्रकरणात सज्जन कुमार हे 2018पासून तुरुंगात होते.
हेही वाचा – Sajjan Kumar : काँग्रेस माजी खासदार सज्जन कुमारांना जन्मठेपेची शिक्षा, नेमके प्रकरण काय?