देशभरात सध्या लोडशेडिंग आणि वीजपुरवठ्याच्या संकटाला सर्वसमान्य जनतेचा सामोरं जावे लागत आहे. कोळश्याच्या अपुऱ्या साठ्यामुळे लोडशेडींगचे संकट वर्तवलं जात आहे. पूर्वोत्तर राज्य झारखंडमधील जनतेला सध्या वीज संकटाला सामोरं जावं लागत आहे. जनतेकडून यावर सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच आता या लोडशेडींग आणि वीजपुरवठ्याबाबत भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीनंही सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
झारखंडमध्ये सध्या भरदिवसा लोडशेडिंगच्या समस्येला नागरिकांना सामोरं जावं लागत आहे. वाढत्या तापमानामुळे राज्यात वीजेची मागणी तब्बल २५०० मेगावॅटहून अधिक झाली आहे. यासाठी पूर्ण जबाबदारी टीव्हीएनएलच्या दोन युनिटवर येऊन ठेपली आहे. ज्यातून जवळपास ३५० मेगावॅट वीजेच उत्पादन होत आहे. २३ एप्रिल रोजी अत्याधुनिक पावर युनिटमध्ये वीजेच्या उत्पादनावर परिणाम झाल्यानं वीज संकट निर्माण झालं आहे.
As a tax payer of Jharkhand just want to know why is there a power crisis in Jharkhand since so many years ? We are doing our part by consciously making sure we save energy !
— Sakshi Singh 🇮🇳❤️ (@SaakshiSRawat) April 25, 2022
दरम्यान, साक्षी धोनीने ट्विटरच्या माध्यमातून राज्यातील वीज संकटावर सवाल उपस्थित केला आहे. इतक्या वर्षांपासून झारखंडमध्ये अजूनही वीजेची समस्या का सोडविण्यात आलेली नाही असा सवाल सरकारला विचारला आहे. तसंच, “झारखंडमधील एक करदाता या नात्यानं एक गोष्ट जाणून घेण्याची माझी इच्छा आहे की झारखंडमध्ये इतक्या वर्षांपासून वीज संकट का आहे? वीजेची बचत यासाठी आम्ही तर जबाबदारीने वागत आहोत”, असं ट्विट साक्षीनं केलं आहे.
#ranchi pic.twitter.com/OgzMHoU9OK
— Sakshi Singh 🇮🇳❤️ (@SaakshiSRawat) September 19, 2019
राज्यातील बहुतांश भागात तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षाही अधिक आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनतेला घामाच्या धारांच्या त्रासाला समोरं जावे लागत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे पश्चिम सिंहभूम, कोडरमा आणि गिरीडीह जिल्ह्यात तापमानाचा कहर पाहायला मिळतो आहे. तर २८ एप्रिलपर्यंत रांची, बोकारो, पूर्वी सिंहभूम, गढवा, पलामू आणि चतरामध्येही उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
साक्षी धोनीने २०१९ मध्येही वीज संकटावर ट्वीटरच्या माध्यमातून सरकारला जाब विचारला होता. “रांचीच्या जनतेला दररोज लोडशेडिंगच्या त्रासाचा सामना करावा लागतोय. दररोज चार ते सात तास वीजपुरवठा खंडीत असतो. आज १९ सप्टेंबर २०१९ रोजी गेल्या पाच तासांपासून रांचीमध्ये वीज नाही. लोडशेडिंगचं कारण समजत नाही. कारण आता वातावरणही चांगले आहे. आज कोणता सणही नाही. मला आशा आहे की या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांकडून तोडगा काढला जाईल”, असं ट्विट साक्षीने केले होते.
हेही वाचा – पाऊण तासानंतर राज्यपालांच्या कार्यक्रमातील वीजपुरवठा सुरळीत; मुंबई, ठाण्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत