देशामध्ये संविधान पायदळी तुडवलं जातं. संविधानाचं राज्य या देशात राहिलेलं नाही. हुकूमशाहीपद्धतीने काम चाललं आहे. राज्य घटना, त्यातील अनेक कलमं, विशेषत: राज्यांचे अधिकार मोडले जात आहेत. त्यामुळे संविधान दिन साजरा करण्याचं नाटक कशाला? असा सवाल शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारला केला आहे. केंद्र सरकारने संविधान दिनानिमित्त सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमावर विरोध पक्षांनी बहिष्कार टाकला. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हा सवाल केला.
आज संविधान दिन आहे. केंद्र सरकारने दिल्लीत कार्यक्रम आयोजित केला आहे. यावर तृणमूल आणि काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसविषयी सांगू शकत नाही. पण माझ्यामते काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. संपूर्ण विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे. कारण या देशामध्ये संविधान पायदळी तुडवलं जातं. संविधानाचं राज्य या देशात राहिलेलं नाही. हुकूमशाहीपद्धतीने काम चाललं आहे. राज्य घटना, त्यातील अनेक कलमं, विशेषत: राज्यांचे अधिकार मोडले जात आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर राजभवनात संविधानाच्या बाबतीत काय चाललंय हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे संविधान दिन साजरा करण्याचं नाटक कशाला? असा सवाल राऊत यांनी भाजपला केला.
संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ
हा देश संविधानाच्या माध्यमातून चालावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीमध्ये काही मुद्दे मांडले होते. संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ आहे. पण तो धर्मग्रंथ गेल्या काही वर्षांपासून रोज पायाखाली तुडवला जातो. त्याची अवहेलना केली जात आहे. आमचं सरकार बहुमतात असूनही आमच्याविरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. सरकारने एक दिवसासाठी सेंट्रल हॉलमध्ये संविधान दिवस पाळायचं ठरवलं आहे. आमचा विरोधी पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा आहे. आम्ही कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नाही. बहिष्काराबाबत आम्ही विरोधकांसोबत आहोत. माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंसोबत चर्चा झाली. आमचं ठरलं. आम्ही सर्वांसोबत आहोत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
हेही वाचा – कामावर जाण्यात एसटी कर्मचाऱ्यांचं हित, जे भडकवतायत ते कुटुंब जगवायला येणार नाहीत – संजय राऊत