NDTVचा चेहरा आणि वरिष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी NDTV इंडिया या वृत्तवाहिनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी वरिष्ठ कार्यकारी संपादकाचा राजीनामा दिला आहे. तसेच बोर्डाकडून त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. NDTVच्या कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या अतंर्गत ईमेलमध्ये रविश कुमार यांचा राजीनामा तात्काळ मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
NDTVमध्ये रविश कुमार अनेक कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत होते. यामध्ये आठवड्याचा शो, रविश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राईम टाईम या कार्यक्रमांचा समावेश होता. रविश कुमार हे अनेक दशकांपासून NDTVचा अविभाज्य भाग बनले होते. एक शांत व्यक्तिमत्वासाठी रविश कुमार यांची ओळख होती. तळागळातील लोकांचे प्रश्न ते मांडत होते.
Just In| #RavishKumar resigns from NDTV. pic.twitter.com/ZDZVzE9fue
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) November 30, 2022
पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना दोन वेळा प्रतिष्ठित रामनाथ गोयंका एक्सलेन्स इन जर्नालिझम अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच आशियातील नोबेल पुरस्कार मानल्या जाणाऱ्या रॅमन मॅगेसेसे पुरस्कारानं त्यांना २०१९ मध्ये सन्मानीतही करण्यात आलं आहे. दरम्यान, NDTVचे प्रवर्तक आणि संचालक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी नुकताच आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांचेही राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत.
देशातील प्रमुख व्यावसायिक समूह अदानी समूह मीडिया कंपनी NDTVविकत घेणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. यावेळी आरआरपीआर होल्डिंगच्या शेअर्सच्या हस्तांतरणामुळे अदानी समूहाला NDTVमध्ये 29.18 टक्के हिस्सा मिळणार आहे. तर येत्या 5 डिसेंबरला अतिरिक्त 26 टक्के समभागासाठी खुली ऑफर देण्यात आली आहे.
हेही वाचा : जे पेरले होते तेच आता उगवले!