नवी दिल्ली – काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी जोरदार तयारी सुरू झाली असून २४ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत रिंगणात उतरले असून आत शशी थरूर यांनीही आपली उमेदवारी जाहीर केली आहे. ३० सप्टेंबर रोजी शशी थरूर निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण असणार यावरून पेच निर्माण झाला होता. सोनिया गांधींनंतर पुढचा अध्यक्ष राहुल गांधी असणार असा कयास लावला जात होता. पक्षातील अनेक नेत्यांनी तशीच मागणी केली होती. सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अशोक गहलोत यांनी राहुल गांधींच्या नावाच प्रस्तावही ठेवला होता. मात्र, राहुल गांधी या पदासाठी इच्छूक नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा – घाबरू नका! डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची स्थिती उत्तम; अर्थमंत्र्यांचा दावा
त्यामुळे, २२ सप्टेंबर रोजी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानंतर, २४ सप्टेंबरपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ८ ऑक्टोबरपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात. तर, १७ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणरा आहे. त्यानंतर लगेच निकाल लागणार असून १९ ऑक्टोबर रोजी पक्षाला नवीन अध्यक्ष मिळणार आहे. २४ वर्षांनंतर गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. सीताराम केसरी हे अखेरचे बिगर गांधी अध्यक्ष होते.
शशी थरूर यांनी आधीही अध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर, अशोक गहलोत यांना स्वतः सोनिया गांधींनी अध्यक्षपदाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यामुळे या निवडणुकीच्या रिंगणात सध्या तरी अशोक गहलोत आणि शशी थरूर यांची नावे चर्चेत असली तरीही येत्या काळात काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेते रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मतदान प्रक्रियेत नऊ हजाराहून अधिक प्रतिनिधी मतदान करणार असून देशातील एकमेव पक्ष असा आहे ज्याचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला जातोय, असा दावाही काँग्रेसने केला आहे.
हेही वाचा – Video : भाजप आमदारांचं मस्त चाललंय! विधानसभेत एक खातोय गुटखा, तर दुसरा खेळतोय गेम