मुंबई : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे लाखो दीप उजळवत तसेच लेझर शोच्या झगमगाटात शनिवारी मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्याची दखल आंदरराष्ट्रीय स्तरावरही घेतली आहे. पण या दीपोत्सवानिमित्त दारिद्र्याची एक काळी बाजू देखील उजेडात आली आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
यावर्षी अयोध्येमध्ये लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव साजरा करण्यात आला. अयोध्या धाममध्ये एकाच वेळी 22 लाख 23 हजार दिवे लावण्याचा विक्रम करण्यात आला. शेकडो स्वयंसेवकांच्या चमूने अथक परिश्रम घेऊन 24 लाख दिवे लावण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वी 18 लाख 81 हजार दिवे लावण्याचा विक्रम होता, तो मोडून यंदा दीपोत्सव कार्यक्रमात 22 लाख 23 हजार दिवे लावण्याचा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनला आहे. या विक्रमाबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड टीमने प्रमाणपत्र दिले.
२२.५० लाख दिवा लावून विश्वविक्रमाचे इमले वगैरे होत असतील. पण दिव्यातील उरलेले तेल आपल्या लेकीसाठी सवयंपाक करण्यासाठी नेणारी ही माता उत्तर प्रदेशमधील गरिबीला अधोरेखित करते. मोफत धन्य आणि अजून काय काय फोल आश्वासनं देऊन गेले शेठजी. पण गरीबाच्या घरात काय पोचलं, तुम्हीच पहा… https://t.co/xjbkwc6JUS
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 13, 2023
ज्या पणत्यांमधील वात पेटली नाही किंवा ज्या लगेच विझल्या त्यातील तेल घेण्यासाठी गरीबांची गर्दी झाली होती. त्यात मुले आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. एका महिला आपल्या मुलाच्या दुखापत झालेल्या डोळ्यांसाठी जमा करत होती. तर, दुसऱ्या महिलेने घरगुती वापरासाठी हे तेल गोळा करत असल्याचे सांगितले. आम्हाला नियमित मजुरी मिळत नसल्याने कधी-कधी उपाशी पोटी राहावे लागते. हे तेल आम्हाला साधारणपणे सात-आठ महिने पुरेल, असे तिने एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
हेही वाचा – “सध्या राज्यात जाहिरातबाजी सुरू”, जयंत पाटलांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला
ठाकरे गटाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 22.50 लाख दिवे लावून विश्वविक्रमाचे इमले वगैरे होत असतील. पण दिव्यातील उरलेले तेल आपल्या लेकीसाठी, सवयंपाक करण्यासाठी नेणारी ही माता उत्तर प्रदेशमधील गरिबीला अधोरेखित करते. मोफत धन्य आणि अजून काय काय फोल आश्वासने देऊन गेले शेठजी. पण गरीबाच्या घरात काय पोहोचले, हे तुम्हीच पाहा, असा खोचक सल्ला त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे.