राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संघर्ष सुरू आहे. दरम्यान निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षावर दावा केल्यानंतर शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. यावेळी शिंदे गटाने 16 आमदा अपात्रतेचे प्रकरण निकाली काढावे, अशी विनंती केली आहे. तर खरी शिवसेना कुणाची हे ठरविण्याचा अधिकार केवळ केंद्रीय निवडणूक आयोगाला असावा असे मत शिंदे गटाने मांडले आहे.
शिंदे गटाने काय म्हंटले –
याबाबत शिंदे गटाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. शिंदे गटाने १६ आमदार अपात्रता प्रकरण निकाली काढावे. चिन्ह आणि नावाबाबत निवडणूक आयोग ठरवेल. निवडणूक आयोगाकडे प्रकरण प्रलंबित असल्याने कोर्टाने याचिकेवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती एकनाथ सुप्रीम कोर्टाला केली आहे.
शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव –
शिंदे गट निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित असलेल्या याचिकांवर निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाला पक्षाच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेण्यापासून रोखावे, अशी मागणी शिवसेनेने केली होती. त्यानंतर शिंदे गटाने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
शिंदे गटाचा शिवसेना पक्षावर दावा –
शिवसेनेचे जवळपास 50 आमदार व 12 खासदार फोडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षावर दावा केला आहे. आम्हीच शिवसेना आहोत, असा दावा शिंदे गटाने यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने 8 ऑगस्टपर्यंत दोन्ही पक्षांना कागदपत्रे पुरावे देण्यास व आक्षेप नोंदवण्यास सांगण्यात आले आहे.