भाजप आणि मोदी सरकारची पोलखोल करणारे मत त्यांच्याच एका माजी कार्यकर्त्याने मांडले आहे. भाजपचे राष्ट्रीय महामंत्री राम माधव यांच्यासोबत काम करणारा कार्यकर्ता शिवम शंकर सिंह याने सरकार विरोधातील खळबळजनक माहिती आपल्या ब्लॉगवर लिहिली आहे. शिवम भाजपमधून बाहेर पडला आहे. त्याने त्याच्या कार्यकर्त्याच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, स्वतःच्या ब्लॉगवर त्याने राजीनाम्याने कारण स्पष्ट केले आहे.
कोण आहे शिवम सिंह?
शिवमने मिशिगन विद्यापीठातून पदवी घेतली असून डेटा अॅनालिटिक्समध्ये तो एक्स्पर्ट आहे. पूर्व भारतातील कित्येक राज्यामंध्ये भाजपच्या सत्तास्थापनेसाठी शिवमने हातभार लावला आहे.
शिवमच्या ब्लॉगमधून …
भाजपने पक्षाचा प्रचार करतानाच विशिष्ट प्रकारच्या मॅसेजना पसरवण्याचं काम चांगल्या पद्धतीने केलं आहे. याच कारणांमुळे मी राजीनामा देत आहे. प्रत्येक पक्षात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी असतात. भाजपने देशात संवादाचा मुद्दाच बदलून टाकला आहे. हे त्यांनी जाणीवपूर्वक केलं आहे. हीच त्यांची सर्वाधिक नकारात्मक बाजू आहे.
– शिवम शंकर सिंह
या कारणांमुळे दिला राजीनामा
- सरकारने मीडियाला बदनाम केलं आहे. प्रत्येक प्रश्न विचारणारा पत्रकार विकला गेला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. भाजप आधी मुद्दा उपस्थित करतात, नंतर तेच विषय दुर्लक्षितही करतात.
- स्वातंत्र्यानंतर गेल्या ७० वर्षांत भारतात कोणतीही विकासाची कामं झालेली नाहीत. जे होतंय ते याच सरकारच्या काळात होत आहे, असं भासवलं जात आहे. मात्र हे साफ खोटं असून ही मानसिकता देशासाठी धोकादायक आहे. या सरकारने जाहिरातींवर सामान्य नागरिकांनी दिलेल्या करातील पैशांतून ४ कोटी रुपये खर्च केले आहेत. आता हाच ट्रेण्ड बनेल. काम कमी, जाहिरात मोठी. असे सगळेच करतील.
- देशात रस्ता बनवणारे मोदी काही पहिले पंतप्रधान नाहीत. त्यांच्यापेक्षा चांगली कामं मायावती आणि अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात झाली आहेत. मात्र प्रत्येक योजनेचा प्रचार असा केला जातो की जणू हे काम मोदींच्या काळातच पहिल्यांदा होत आहे.
- मोदी सरकारमध्येच फेक न्यूजचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला आहे. अँटी भाजप फेक न्यूज पण आहे, मात्र प्रो-भाजप आणि अँटी-अपोजिशन सारख्या फेक न्यूजची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे. असे मॅसेज भाजपच्या वतीनेच जास्त येत आहेत. हे समाज विघातक मेसेज असून यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते.
- ‘हिंदू आणि हिंदुत्व धोक्यात आहे. त्यापासून वाचवणारे मोदी हे एकमेव पर्याय आहेत,’ अशी मानसिकता लोकांची बनवली जात आहे. वास्तविक पाहता असे अजिबात नाही.
- सरकारविरोधात बोलणाऱ्याला देशद्रोही म्हटलं जात होतं आणि आता तर हिंदू विरोधीही म्हटलं जात आहे. ‘तुमचं देशप्रेम सिद्ध करा, प्रत्येत ठिकाणी वंदे मातरम् म्हणा’ अशी सक्ती लोकांवर केली जात आहे.
- भाजपचे स्वामित्ववाले न्यूज चॅनेल्स सातत्याने चालवले जातात. ज्यांचं एकमेव काम हिंदू-मुस्लिम, नॅशनल-अँटी नॅशनल, भारत-पाकिस्तान या विषयांवर चर्चा घडवून आणणं हे असतं. लोकांच्या भावना भडकवणं. देशातील मुख्य मुद्दयांना बगल देणं, हे भाजप सरकार मुख्य काम बनलं आहे.