पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (Aam Adami Party) एकहाती सत्ता प्राप्त केल्यानंतर अनेक धाडसी निर्णय घेतले होते. त्यापैकी एक निर्णय म्हणजे व्हिव्हिआयपी (VVIP) लोकांची सुरक्षा काढून घेणे. एप्रिल महिन्यात काही लोकांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर मे महिन्यात पुन्हा ४२४ व्हिव्हिआयपी लोकांची सुरक्षा काढून घेण्यात आली. हा निर्णय होताच २४ तासांच्या आत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Siddhu Moosewala) याची हत्या झाली. त्यामुळे सुरक्षा कपातीचा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली. त्यानुसार, भगवंत मान (CM Bhagwant Mann) सरकारने हा निर्णय मागे घेतला असून ७ जूनपासून या ४२४ लोकांना पुन्हा सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.
प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याची २९ मे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. २८ मे रोजी त्याची व्हिव्हिआयपी (VVIP) सुरक्षा काढून घेण्यात आल्यानंतर त्याची हत्या झाली. त्यामुळे पंजाबमध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओमप्रकाश सोनी यांनी सुरक्षा कपातीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेची दखल घेत न्यायालयाने भगवंत मान सरकारला फटकारले. व्हिव्हिआयपी व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याआधी परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व पातळ्यावंर विचारमंथन होणे गरजेचे आहे असं न्यायालयाने म्हटलं. तर, काही कालावधीपर्यंतच ही सुरक्षा काढून घेण्यात आली होती, अशी भूमिका मान सरकारने मांडली. त्यामुळे ७ जूनपासून ४२४ लोकांना त्यांची सुरक्षा पूर्ववत करण्यात येणार आहे.
सत्तेत आल्यानंतर पंजाब सरकारने (Punjab Government) अनेक राजकीय मंडळी, सेवानिवृत्त अधिकारी, कार्यरत पोलीस अधिकारी, धर्मगुरू यांची सुरक्षा काढून घेतली होती. एप्रिलमध्ये सुरक्षा कपात आलेल्या व्हिव्हिआयपींमध्ये माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणिंदर सिंग, काँग्रेस आमदार प्रताप सिंह आणि बाकीच्या नेत्यांचाही समावेश होता.