राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत. या मृतांमध्ये 4 लहान मुलांचा समावेश आहे. या संपूर्ण कुटुंबाने एकत्र आत्महत्या केली की त्यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला आहे. तसेच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूर जिल्ह्यातील गोगुंडा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना समोर आली आहे. झरोली पंचायतीच्या गोल नेदी गावातील एका कुटुंबातील 6 जणांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांना मृत प्रकाश प्रजापती, त्याची पत्नी दुर्गाबाई आणि चार निष्पाप मुलं घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. ही चारही मुलं 2 ते 8 वयोगटातील होती.
पत्नी आणि चार मुलांना फासावर लटकवत प्रकाशने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती परिसरात समजताच लोकांची एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा करत आहेत. प्रकाश कामासाठी बाहेर जात होता, मात्र नवरात्रीला तो घरी आला तेव्हापासून तो पुन्हा बाहेर गेलाच नाही. दरम्यान या कुटुंबात काही भांडण झाल्याचा किंवा कसलीही कुणकूण आजूबाजूच्यांना लागली नाही.