देशात कोरोना दिवसागणीक वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडईन घोषित करण्यात आले आहे. देशभरात कोरोनाबाधीतांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात कोरोनाबाधीतांची संख्या १ हजार ७१ पर्यंत गेली आहे. परंतु चांगली गोष्ट म्हणजे यातील १०० रूग्ण बरे झाले आहेत आणि रुग्णालयातून घरी परत गेले आहेत. तर २९ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाविरूद्धची लढाई डॉक्टर आणि परिचारिका पूर्ण जबाबदारीने लढत आहेत. दिल्लीच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये सहा डॉक्टर्स आणि चार नर्स कोरोना रूग्णाच्या संपर्कात आले. कोरोना रूग्णाच्या संपर्कात आल्यानंतर डॉक्टर आणि परिचारिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर प्रोटोकॉल अंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे.
हेही वाचा – Coronavirus:…जर लॉकडाउन नसते तर जगात ४ करोड लोकांचा मृत्यू झाला असता
दरम्यान, रविवारी दिल्लीत कोरोनाचे २३ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिल्लीत कोरोनाग्रस्तांचा आकडा ७२ वर पोहोचला आहे. गुरुवारी, येमेनमधील एका ६० वर्षीय नागरिकाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीत हा दुसरा मृत्यू आहे.
पंतप्रधानांनी केलं कौतुक
कोरोनाविरूद्धच्या युद्धामध्ये डॉक्टर आणि परिचारिका खूप महत्वाची भूमिका बजावत आहेत. ज्याचे पंतप्रधान मोदींनीही कौतुक केले होते. २४ मार्च रोजी पंतप्रधानांनी डॉक्टर, परिचारिका आणि लॅब तंत्रज्ञांशी संवाद साधला. कोरोनाग्रस्तांना नि:स्वार्थ सेवा दिल्याबद्दल त्यांनी डॉक्टर, परिचारिका यांचे आभार मानले.