एकीकडे कोरोनाने नागरिक हैराण झाले असताना दुसरीकडे या काळात आत्महत्यांच्या घटनेत देखील वाढ होताना दिसत आहे. ‘आजतक’च्या वृत्तानुसार अशीच एक घटना समोर आली आहे. मुलगा विवाहित महिलेसह पळून गेल्याने अस्वस्थ झालेल्या आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार; जोधपूरच्या देव नगर पोलीस स्टेशन परिसरातील मैसूरियामधील श्रमपुरा येथे एका कुटुंबातील पती-पत्नीने रविवारी सकाळी स्वत:च्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रविवारी सकाळी कुटुंबियांनी दरवाजा ठोठावला मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी खिडकीत डोकावून पाहिले असता, त्यांच्या पाया खालची जमिनच सरकली. कारण या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. पती-पत्नीच्या आत्महत्येची माहिती मिळताच देव नगर पोलीस ठाणे घटनास्थळी पोहोचले आणि दोघांना मथुरादास माथूर रुग्णालयामध्ये घेऊन गेले. पण, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले होते. सध्या दोघांचे मृतदेह मथुरा दास माथूर रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आले होते, तेथे त्यांच्या कोरोना तपासणीनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करुन कुटुंबाकडे स्वाधीन करण्यात आले.
प्राथमिक तपासात मृत विष्णू दत्त आणि त्यांची पत्नी मजू देवी हे गेल्या कही काळापासून मानसिक ताणतणावात होते. तसेच अलीकडेच त्यांच्या मुलाने विवाहित महिलेस पळवून नेले होते आणि त्यामुळे ते अधिकच मानसिक तणावात होते. या तणावातच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचले असल्याचे बोले जात आहे. याप्रकरणी मृताच्या कुटुंबियांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
हेही वाचा – सेल्फी काढायला गेलेली पत्नी डोळ्यांसमोरुन अचानक झाली गायब!