काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशातील सर्व विरोधी पक्षनेत्यांची बैठक आयोजित केली होती. सोनिया गांधींच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षनेते व्हिसीद्वारे बैठकीला उपस्थित होते. केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारविरोधात सर्व विरोधी पक्ष पुन्हा एकवटले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच एकत्र येण्याचे आवाहनही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. देशाच्या घटनात्मक तरतुदी आणि स्वातंत्र्य चळवळीच्या मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या सरकारची निर्मीती होणं महत्त्वाची आहे. यामुळे विरोधी पक्षांनी एकजूट व्हावं असे आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे.
काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशातील विरोधी पक्षनेत्यांच्या कामांचेही कौतुक केलं आहे. तसेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सर्व विरोधी पक्षातील खासदारांनी एकजूट दाखवत सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचे काम केलं आहे. या सर्व खासदारांचे सोनिया गांधी यांनी कौतूक करत म्हटलं आहे की, मला विश्वास आहे की, या पुढेही सर्व विरोधी पक्षाचे खासदार अशाच एकजूटतेने लढा देतील आणि देशाला न्याय मिळवून देतील. मात्र आता संसदेच्या बाहेर आपल्याला लढा द्यायचा आहे. मोदी सरकारविरोधात सक्षम सरकार आणण्यासाठी काम करावं लागेल असे सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
आगामी २०२४ लोकसभा निवडणूकीमध्ये देशाला असे सरकार द्यायचे आहे. जे सरकार उत्तमरित्या योजना करु शकेल आणि जे स्वातंत्र्य चळवळींच्या मुल्यांवर आणि घटनात्मक तरतुदींवर विश्वास ठेवणारं असेल. सोनिया गांधी यांनी पुढे म्हटलं आहे की, आपल्यासाठी हे एक आव्हान आहे. परंतु आपण एकत्र मिळून यावर मात देऊ शकतो कारण एकत्र येण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. आपल्या सर्वांच्या काही अडचणी आहेत मात्र या अडचणी बाजूला ठेवून आपल्याला सोबत यावं लागेल. काँग्रेस आपल्या भूमिकेत कुठेही कमी पडणार नाही असे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : लोकशाही, धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणाऱ्यांनी एकत्र यावं, विरोधी पक्षांच्या बैठकीत शरद पवारांचे आवाहन